Muhammad Yunus : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मागील काही दिवसांपासून बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु आहेत. बांगलादेशच्या लष्कराने अंतरिम सरकारला डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर अचानक मोहम्मद युनूस हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा समोर आली. यानंतर अखेर मोहम्मद युनूस यांनी सर्व सल्लागारांची बैठक घेत चर्चा केली. त्यानंतर मोहम्मद युनूस हे राजीनामा देणार नसल्याचं सल्लागारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, बांगलादेशचं अंतरिम सरकार आणि लष्करामध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चा आता लष्कराने फेटाळून लावल्या आहेत. बांगलादेश लष्कर आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं आता बांगलादेश लष्कराचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर जनरल मोहम्मद नाझिम-उद-दौला यांनी लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-जमान आणि अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारांमध्ये कोणताही मतभेद नसल्याचं सांगितलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
बांगलादेश लष्कर आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमधील मतभेदांबद्दलच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ब्रिगेडियर जनरल नाझिम-उद-दौला यांनी सांगितलं की, “हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढू नये. सरकार आणि बांगलादेशच्या सैन्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र काम करत आहोत. प्रत्येक पावलावर एकमेकांना पूरक आहोत”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“तसेच लष्कर आणि सरकार एकाच कुटुंबाचे भाग आहेत. कोणत्याही किरकोळ कारणांकडे कुटुंबाप्रमाणेच पाहिलं पाहिजे. कधीकधी शब्दांमध्ये किंवा समजुतींमध्ये फरक असू शकतो. मात्र, ही फूट पडण्याची चिन्हे नाहीत. ते प्रक्रियेचा भाग आहेत आणि सर्वकाही सोडवता येत”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बांगलादेशची स्थिती बिकट, कामगारांचं कामबंद आंदोलनं
बांगलादेशची आर्थिक व सामाजिक स्थिती दिवसेंदिवस खालावतेय. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या धोरणांविरोधात सामान्य नागरिक व शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी ढाक्याची स्थिती बिकट झाली आहे. ढाक्यात प्रामुख्याने आंदोलनं होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. तिथल्या सरकारला मोठ्या उद्रेकाची भीती सतावतेय.
दरम्यान, बांगलादेशमधील प्रमुख व्यावसायिक समुदायाचे नेते शौकत अझीज रसेल यांनी देखील देशाची आर्थिक स्थिती खराब असल्याची चिंता व्यक्त केली. रसेल म्हणाले, १९७१ च्या मुक्ती युद्धावेळी देशात ज्या पद्धतीने बुद्धिजीवींना ठार मारण्यात आलं होतं, तसंच यावेळी देशातील व्यावसायिकांना मारलं जात आहे. देशातील बेरोजगारी वाढली आहे. भीषण दुष्काळात एखादा देश संघर्ष करतो तशीच काहिशी स्थिती निर्माण झाली आहे.