DK Shivakumar breaks down over Bengaluru Stampede Deaths : आयपीएल २०२५ स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजय उत्सवादम्यान बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गुरुवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

माध्यमांशी बोलताना शिवकुमार हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबद्दल बोलताना ही घटना राज्यासाठी हृदयद्रावक असल्याची प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे.

डीके शिवकुमार नेमकं काय म्हणाले?

“आपण एक प्रशासकीय धडा घेतला पाहिजे, विरोधकांना मृतदेहांवर राजकारण करू द्या. त्यांनी किती मृतदेहांचे राजकारण केले मी त्याची यादी करून ठेवेन. पण लहान मुलांना पाहून वाईट वाटते. मी त्यांची वेदना पाहीली आहे,” असे शिवकुमार म्हणाले.

शिवकुमार यांनी माफी मागितल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की, “असे घडायला नको होते आणि आम्ही इतक्या मोठ्या गर्दीची अपेक्षा नव्हती… स्टेडियमची क्षमता ३५,००० आहे, पण ३ लाखांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते… गेट्स (स्टेडियमचे दरवाजे) तुटले आहेत…. या घटनेबद्दल आम्ही माफी मागतो… आम्हाला सत्य माहिती करून घ्याचे आणि स्पष्ट संदेश द्यायचा आहे.”

यावेळी शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षाकडून या घटनेचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. “भाजपा राजकारण करत आहे… या घटनेबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही भविष्यासाठी यापेक्षा चांगले उपाय शोधू.”

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२५ च्या हंगामाच्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्ज संघाचा पराभव केला. यानंतर बंगळुरू शहरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला. आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या जल्लोषापूर्वी हजारो चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ जमले असताना चेंगराचेंगरी झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक सरकारने चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली . सरकार जखमींना मोफत उपचार देखील दिले जातील असेही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.