लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून (३० मे) ४८ तास ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. ही ध्यानधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जाऊन करणार आहेत. आता डीएमकेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रचार संपल्यानंतरच्या शांतता कालावधीत अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या प्रचार करण्यास मनाई असते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता नियमला बगल दिली आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर डीएमकेने थेट या दौऱ्याला विरोध दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ध्यानधारणा दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत म्हणजेच शनिवार संध्याकाळपर्यंत विवेकानंद स्मारकात मौन धारण करुन ध्यानधारणा करणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही घोषणा केली आहे. त्यासाठी कन्याकुमारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ध्यानधारणेला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके या पक्षांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, अभिषेक मनु सिंघवी सय्यद नासीर हुसेन यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी अर्ज दिला आहे आणि हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.

हे पण वाचा- पंतप्रधान मोदी विवेकानंद स्मारकामध्ये ४८ तास ध्यानात बसणार; या वास्तूचे काय आहे वेगळेपण?

अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी काय म्हटलंय?

“निवडणूक होण्याच्या ४८ तास आधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या कुणालाही प्रचार करता येत नाही. तो शांतता काळ असतो. कितीही मोठा नेता असूद्या कुणालाही हे करता येत नाही. आमचा कुणाचं मौनव्रत, ध्यानधारणा याबाबत काहीही आक्षेप नाही. मात्र शांतता काळात अप्रत्यक्षरित्या प्रचार होऊ नये. तसं घडलं तर आचारसंहितेचं ते उल्लंघन आहे.” असं अभिषेक मनु सिंघवींनी म्हटलं आहे.

याप्रकरणी कपिल सिब्बल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी जात आहेत कारण त्यांनाही माहीत आहे की त्यांच्याकडून काय चुका झाल्या आहेत. विवेकापासून खूप अंतर लांब असलेले पंतप्रधान विवेकानंदांच्या स्मारकामध्ये जाऊन ध्यानधारणा करत आहेत कशासाठी? ज्या माणसामध्ये विवेक असेल त्याला ध्यानधारणा करुन समाधान मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणांमध्ये व्होट जिहाद, मंगळसूत्र खेचतील या गोष्टी केल्या. या विवेकाने बोलण्याच्या गोष्टी आहेत का? शो ऑफसाठी कन्याकुमारीला जात आहेत का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीएमकेने काय म्हटलंय?

डीएमकेने या दौऱ्याचा विरोध केला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. कन्याकुमारीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे की मोदींच्या ध्यानधारणेला विरोध केला आहे. न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे हे पत्र देण्यात आलं आहे की विवेकानंद स्मारकात ध्यान करण्यासाठी पंतप्रधान मोदींना संमती देऊ नये. आता या प्रकरणी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एवढंच नाही तर या ध्यानधारणेचं कुठलंही मीडिया कव्हरेज होऊ नये असंही या अर्जात म्हटलं आहे.