Dowry Harassment Case: महाराष्ट्रात वैष्णवी हगवणेचे हुंडाबळी प्रकरण गाजत असताना कोलकाता उच्च न्यायालयाने हुंडाबळीच्या एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. “हुंड्यामुळे झालेल्या छळाच्या प्रकरणात अनेकदा पीडिता किंवा पीडितेचे कुटुंब एफआयआर दाखल करत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना वैवाहिक संबंध टिकवायचे असतात”, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

प्रकरण काय आहे?

२००९ साली सत्र न्यायालयाने याचिकाकर्त्याला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली आणि तिचा छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले होते. या निकालाला याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिकाकर्त्यावर भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३०२ (खून), ४९८ अ (नवरा किंवा त्याच्या कुटुंबाकडून छळ) आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले होते.

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजर्शी भारद्वाज आणि न्यायाधीश अपुर्बा सिन्हा रॉय यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने म्हटले, “हे खरे आहे की, पीडिता किंवा पीडिताच्या कुटुंबियांकडून हुंड्यासाठी छळ झाल्याची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पण याचा अर्थ नातेवाईक छळाची खोटी माहिती देत आहेत, असे होत नाही. आपल्या समाजातील हे वास्तव आहे. नवऱ्याच्या कुटुंबियांकडून हुंड्याची मागणी होते. मात्र पती-पत्नीचे वैवाहिक जीवन टिकावे यासाठी मुलीच्या पालकांकडून कोणतीही तक्रार दाखल केली जात नाही.”

खंडपीठाने पुढे म्हटले की, पत्नी बाळंतीण झाल्याच्या तीन दिवसांनंतर आरोपीने तिचा अतिशय क्रूर पद्धतीने खून केला. पत्नीच्या चेहऱ्यावर वारंवार ठोशे मारल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादी पक्षाने सिद्ध केले आहे. त्यानंतर आरोपीने पत्नीच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट व्हावेत, असा आरोपीचा हेतू होता. तथापि अंत्यसंस्कार पूर्ण होऊ शकले नाही.

महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने हुंड्यासाठी झालेल्या छळावर लक्ष केंद्रीत केले. हुंड्यासाठी झालेल्या छळाची पत्नी किंवा तिच्या नातेवाईकांनी औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही, याचा अर्थ हे आरोप खोटे ठरतात, असे होत नाही. आरोपी पतीने बाळंतीण पत्नीची हत्या करून तिच्या बाळाला आयुष्यभरासाठी आईच्या प्रेम, वात्सल्यापासून पोरके केले आहे. हाही एक क्रूर प्रकार आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत खून, क्रूरता या गुन्ह्यांसाठी त्याची शिक्षा कायम ठेवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवी हगवणे प्रकरणातही हुंड्याची तक्रार नाही

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातही वैष्णवी कस्पटे यांच्या कुटुंबियांनी सोने, गाडी आणि इतर महागड्या वस्तू पती शशांक हगवणेला दिल्याचे सांगितले आहे. हुंड्यासाठी छळ होत असला तरी लग्न टिकावे, असाच प्रयत्न कस्पटे कुटुंबियांनी केला होता. त्यांनी हुंड्याबाबत तक्रार दाखल केली नव्हती.