नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (एनएसई) आज गुंतवणूकदारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे वायदे बाजार ठप्प झाला होता. तसेच शेअरच्या किमतींबाबतही गुंतवणूकदारांना काही माहिती मिळत नसल्याचे सांगण्यात आले. नगदी बाजारातील तांत्रिक बिघाडामुळे रोख आणि वायदा-विकल्प श्रेणीत व्यवहार ठप्प झाल्याचे एनएसईने म्हटले. सकाळी ९.३० पासून हा बिघाड झाला होता.  दुपारी साडेबाराच्या सुमारास ट्रेडिंग पुन्हा सुरू झाले. आठवड्याच्या प्रारंभीच ही अडचण आल्याने शेअर गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, एनएसईमध्ये शेअरच्या नव्या दराची किंमत समजत नसल्याचे ब्रोकर सांगत होते. वायदे बाजारातही अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानातील तज्ज्ञ हे प्रकरण हाताळत असून लवकरच शेअर बाजार सुरू होईल, अशी माहिती एनएसईने दिली होती. नगदी आणि वायदा-विकल्प व्यवहार सेवा दुपारी १२ पर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले होते.

शेअरबाजार सुरू होताच आज सकाळी सेन्सेक्सने २३५ अंकाची उसळी घेतली आणि आपल्या सर्वकालिक ३१,५९५ या पातळीवर पोहोचला. महत्वाच्या कंपन्यांचा तिमाही निकाल चांगला लागल्यामुळे असे निकाल आल्याचे आर्थिक तज्ज्ञांनी म्हटले आहे.