पीटीआय, नवी दिल्ली : जुलै २०२० मध्ये दक्षिण काश्मीरमधील अमशीपुरा येथे तिघा जणांची ‘ठरवून’ चकमक (एनकाऊंटर) घडवून आणल्याच्या संबंधात लष्कराने एका वर्षांच्या आत कोर्ट मार्शलची कार्यवाही पूर्ण केली असून, संबंधित कॅप्टनला जन्मठेपेची शिक्षा देण्याची शिफारस केली आहे. सशस्त्र दले (विशेषाधिकार) कायद्याचा (आफस्पा) सैनिकांनी अवास्तव वापर केल्याचे कोर्ट ऑफ एन्क्वायरी व समरी ऑफ एव्हिडन्समध्ये आढळल्यानंतर, कॅप्टन भूपेंद्र सिंह यांच्यावर कोर्ट मार्शलची कार्यवाही करण्यात आली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्यानतंर जन्मठेप निश्चित होईल, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. लष्करातील सूत्रांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. अशा प्रकरणांमध्ये पार पडणारी प्रक्रिया अद्यापही सुरू आहे, असे ते म्हणाले. जम्मू भागातील राजौरी जिल्ह्याचे रहिवासी असलेले इम्तियाझ अहमद, अब्रार अहमद व मोहम्मद इब्रार हे १८ जुलै २०२० रोजी शोपियाँ जिल्ह्यातील एका दुर्गम पहाडी खेडय़ात मारले गेले होते आणि त्यांच्यावर ‘दहशतवादी’ असा शिक्का मारण्यात आला. तथापि, या हत्यांबाबत समाजमाध्यमांवर शंका घेण्यात आल्यानंतर लष्कराने तत्परतेने कोर्ट ऑफ एन्क्वायरी स्थापन केली. सैनिकांनी ‘आफस्पा’अन्वये मिळालेल्या अधिकारांचा प्रमाणाबाहेर वापर केल्याचा सकृद्दर्शनी पुरावा त्यात आढळला. जम्मू- काश्मीर पोलिसांनीही या प्रकरणात स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने ‘खोटी चकमक घडवून आणल्याबद्दल’ कॅप्टन सिंह यांच्यासह तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.