काश्मीरमध्ये पंडित नेहरुंच्या काळात जी स्थिती होती त्यामुळे संयुक्त राष्ट्रात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. पूँछ आणि राजौरी वाचवण्यासाठी सैन्य वळवावं लागलं. पूँछ आणि राजौरी आज भारताचा भाग आहेत तो त्याच निर्णयामुळे आहे. काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेला पाहिजे हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह सगळ्यांनीच त्यांना हा सल्ला दिला होता असं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुलांनी म्हटलं आहे. अमित शाह खोटं बोलत आहेत असं म्हणत त्यांनी अमित शाह यांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?

संयुक्त राष्ट्रांकडे जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. या ठिकाणी शांतता प्रस्थापित होण्यासाठीच पंडित नेहरु संयुक्त राष्ट्रांकडे हा प्रश्न घेऊन गेले. लॉर्ड माऊंटबॅटन आणि सरदार पटेल यांच्यासह सगळ्यांनीच हा सल्ला दिला. आता हे (अमित शाह) लोकांशी खोटं बोलत आहेत तर काय करणार? त्यावेळी भारताची परिस्थितीच अशी होती. त्यावेळी सैन्य वळवलं नसतं आणि फौजांनी राजौरी आणि पूँछ वाचवलं नसतं तर ते पण पाकिस्तानात गेलं असतं. त्यासाठीच हा निर्णय घेतला गेला असंही फारुख अब्दुलांनी म्हटलं आहे.

काश्मीरमध्ये शांतता आहे तर मग लष्कराचे जवान का मारले जात आहेत?

काश्मीरमध्ये दहशतीचं वातावरण संपलं असं हे सांगतात. मला सांगा तिथे किती फौजा आहेत? BSF, CRPF आणि इतर फौजा आहे. इतक्या फौजा आणि लष्कर तिथे असूनही आपले जवान आणि अधिकारी मरत असतील तर त्याचं कारण काय? दहशतवाद संपला म्हणत आहेत मग हे का घडतं आहे? असाही प्रश्न फारुख अब्दुला यांनी विचारला आहे.

अमित शाह काय म्हणाले पंडित नेहरुंबाबत?

पंडित नेहरुंची आणखी एक चूक संयुक्त राष्ट्रात भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा नेणं असं अमित शाह म्हणाले. “पंडित नेहरुंची चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रात आपला मुद्दा घेऊन जाण्याची चूक. एका पत्रातल्या मजकुरातला एक भाग मी वाचून दाखवतो”, असं म्हणत अमित शाह यांनी हातातील कागदावरचा एक मजकूर वाचून दाखवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्लांना लिहिलेलं हे पत्र आहे. ‘संयुक्त राष्ट्राच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलोय की तिथून कोणत्याही समाधानकारक उत्तराची अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही. मला युद्धबंदी हा एक चांगला निर्णय वाटला. पण या मुद्द्यावर योग्य पद्धतीने उत्तर शोधलं गेलं नाही. आम्ही युद्धबंदीवर अधिक विचार करून काही चांगला पर्याय शोधू शकलो असतो. मला वाटतं की भूतकाळात ही आमच्याकडून झालेली चूक आहे”, असा उल्लेख असलेला मजकूर अमित शाह यांनी वाचून दाखवला.“विरोधक विनाकारण माझ्यावर चिडचिड करत आहेत. मी नेहरूंचं पत्र वाचून दाखवत आहे. त्यांना चिडचिड करायचीच असेल, तर त्यांनी नेहरूंवर करायला पाहिजे”, असंही अमित शाह म्हणाले. या आरोपांवर आता फारुख अब्दुल्लांनी उत्तर दिलं आहे.