गेल्या काही दिवसांपासून देशभरात शिक्षण संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वादंग सुरूच आहे. या प्रकरणी न्यायालयाने निकाल देऊनही यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येतच आहेत. काहींनी न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलं असलं तरी काहीजण मात्र या निकालावर निराश आहेत. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी हेही या निकालावर नाराज असल्याचं दिसून आलं आहे.


कुरेशी यांनी हिजाबप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, कुरेशी म्हणाले, “हिजाब कुरानचा भाग नाही, पण मुलींनी शालीन कपडे परिधान करावेत हे सांगण्यात आलं आहे. शाळेच्या गणवेशामध्ये शिखांची पगडी आणि सिंदूर लावण्याची परवानगी आहे, मग हिजाब घालण्यास काय हरकत आहे? हिजाब आवश्यक आहे की नाही हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नाही”.

हेही वाचा – “शिकलेल्या हिंदू मुली मुस्लीम मुलांना जाळ्यात ओढतात”; लव जिहादबद्दल माजी निवडणूक आयुक्तांचं विधान


याच अनुषंगाने त्यांनी लव जिहादप्रकरणीही भाष्य केलं आहे. ते म्हणाले,”लव जिहाद हा एक प्रोपगंडा आहे. यात मुस्लीम मुलींना अधिक धोका आहे. कारण त्यांच्या नजरेतून पाहिलं तर शिकलेल्या हिंदू मुली मुस्लीम मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात. अशा परिस्थितीत लव जिहादमुळे मुस्लिमांना अधिक नुकसान होतं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


हिजाब प्रकरणी न्यायालयाचा निकाल काय?


हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.