उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने शनिवारी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारी मोफत धान्य योजना आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळात ही मोफत धान्य योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील १५ कोटी नागरिकांना याचा लाभ मिळत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. मार्चमध्ये या योजनेची मुदत संपत होती. या योजनेनुसार पुढील तीन महिने नागरिकांना अन्नधान्याबरोबर डाळी, मीठ, साखर मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात या योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. करोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री अन्न योजना सुरू केली आहे, देशभरातील ८० लाख नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे. राज्य सरकारने अंत्योदय लाभार्थ्यांसाठी एप्रिल २०२० पासून योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कुटुंबांना ३५ किलो अन्नधान्य मिळत आहे. त्याबरोबतच राज्य सरकार एक किलो डाळ तसेच तेल व मीठ प्रत्येक कुटुंबाला देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, ब्रिजेश पाठक तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकारी उपस्थित होते.