गुजरातमधून आश्चर्यकारक आकडे समोर आले असून, येथे लैंगिक विषमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसू आले आहे. येथे मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूपच कमी आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’तील वृत्तानुसार ११.८३ लाख तरुण अविवाहित असल्याची नोंद २०११ च्या जनगणनेत आहे. २५ ते ३४ वयोगटातील या तरुणांमध्ये ९.१६ लाख मुले तर २.६७ लाख मुली आहेत. म्हणजेच दोन अविवाहित मुलींमागे सात अविवाहित मुले असे हे प्रमाण आहे. सौराष्ट्रमधील मुलांशी तर मुली लग्न करायलाच तयार नसतात. रमेश पटेल हा येथील ३४ वर्षीय रहिवासी लग्नाच्या प्रतिक्षेत आहे. सौराष्ट्रमधील दुष्काळामुळे कोणतीही मुलगी लग्न करून येथे नांदायला तयार नसल्याची माहिती त्याने दिली. एका मुलीने लग्नासाठी त्याला होकार दिला होता. परंतु, रमेशने सौराष्ट्रमधील आपले घर सोडून त्यांच्याबरोबर पोरबंदरमधील शहरी भागात राहण्यास यावे, अशी अट मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी घातली होती. कुटुंबियांना सोडून जाणे रमेशच्या मनाला पटले नाही. परिणामी त्याचे लग्न होता-होता राहिले.
पोरबंदरमध्ये परिस्थिती अधिक गंभीर : आकड्यांनुसार पोरबंदरमध्ये ७.४८ टक्के अविवाहित मुले आणि मुली असून, २५ वर्षांपेक्षा जास्त वयाची ही मुले आहेत. त्यानंतर नवसारी (७.२२ टक्के), जुनागढ (६.७५ टक्के), भरूच (६.६१ टक्के) आणि अहमदाबादचा (६.९३ टक्के) क्रमांक येतो. १९८१ च्या तुलनेत मुलींच्या संख्येत घट आल्याचे पाहायला मिळते. १९८१ मध्ये जिथे १००० मुलांमागे ९४७ मुली असे हे प्रमाण होते, तिथे २०११ मध्ये मुलींची संख्या ८८६ इतकी नोंदवली गेली आहे.
याबाबत मानसतज्ज्ञांना विचारले असता शिक्षित मुली हे प्रमुख कारण असल्याचे त्यानी नमूद केले. शिक्षित मुली त्यांच्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करण्यास नकार देतात. ज्यामुळे अविवाहित मुलांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.