जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर लवकरच नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे आझाद म्हणाले होते. या पक्षाची घोषणा येत्या १४ दिवसांमध्ये होईल, अशी माहिती जम्मू काश्मीरचे माजी मंत्री ताज मोहीउद्दीन यांनी दिली आहे. मोहीउद्दीन यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिली असून ते गुलाम नबी आझाद यांच्या गटात सामील झाले आहेत.

गुजरातला बदनाम करून गुंतवणूक रोखण्यासाठी कटकारस्थाने ; पंतप्रधान मोदी यांचा दावा 

गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वातील नवा पक्ष ‘जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’(JKNC) आणि ‘द पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ (PDP) यांच्या पक्षासोबत युती करणार असल्याचे संकेत मोहीउद्दीन यांनी दिले आहेत. “आम्ही आमचा नवा पक्ष स्थापन करणार आहोत. याबाबतची घोषणा येत्या १४ दिवसांमध्ये केली जाईल. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाच्या संपर्कात आहोत. आम्ही कुठल्याही पक्षात विलीन होणार नसलो तरी जागांची गरज भासल्यास जेकेएनसी आणि पीडीपी या पक्षांसोबत युती करू शकतो” असे मोहीउद्दीन म्हणाले आहेत.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळापासून गुलाम नबी आझाद काँग्रेसमधील अत्यंत आवडते व्यक्ती होते. काँग्रेसला उंचीवर नेण्यात आझाद यांचं मोठं योगदान आहे. सोनिया गांधींना भक्कम पाठिंबा देणाऱ्यांपैकी ते एक होते. ते खुप प्रतिभावान असल्यानं त्यांनी काँग्रेसमधील मोठमोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या, असे मोहीउद्दीन म्हणाले. आझाद भाजपासोबत असल्याच्या खोट्या प्रचारावर देखील त्यांनी यावेळी टीकास्त्र डागले.

अखेर अध्यक्षनिवड ऑक्टोबरमध्ये ; काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम निश्चित

काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासोबतच सर्व पदांचा आझाद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडताना काँग्रेस खासदार राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधींची विचारसरणी अत्यंत वेगळी आहे. ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही”, असं खान यांनी म्हटलं होतं. तर राहुल गांधी अपरिपक्व आणि बालिश आहेत, असा शाब्दिक हल्ला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या नाराजी पत्रात गुलाम नबी आझाद यांनी केला होता.