गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी गुरुवारी आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला आहे. मात्र, या जागेवरून भाजपा आपल्याला नक्कीच तिकीट देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी २५ वर्षांहून अधिक काळ या जागेचे प्रतिनिधित्व केले होते.

“मी पक्षाला आधीच सांगितले आहे की मला पणजीतून निवडणूक लढवायची आहे आणि मला विश्वास आहे की पक्ष मला तिकीट देईल,” असे उत्पल पर्रिकर म्हणाले. दरम्यान, सध्या या जागेचे प्रतिनिधित्व करणारे अतानासियो मोन्सेराते इतर नऊ आमदारांसह भाजपामध्ये सामील झाले आहेत. ज्यांनी २०१७ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली होती.

उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून तिकीट न दिल्यास काय करणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, यावर बोलण्याची ही वेळ नाही. त्याबद्दल मला आता बोलण्याची गरज नाही, असे उत्पल पर्रिकर म्हणाले. “मनोहर पर्रिकर यांना आयुष्यात सहजासहजी काही मिळाले नाही. मला त्याच पद्धतीने काम करावे लागेल. मला काही कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते आणि त्याच्यासाठी शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करतो. मला हे निर्णय घ्यावे लागतील. मी पक्षाला सांगितले आहे आणि मला खात्री आहे की पक्ष मला तिकीट देईल. माझा विश्वास आहे,” असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.

पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मनोहर पर्रिकर यांनी यापूर्वी अनेकदा केले आहे. २०१९ मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा पणजीची जागा काँग्रेसचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात यांच्याकडून हरली होती. अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उद्योगपती उत्पल पर्रिकर यांनी मार्च २०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, पक्षाच्या तिकिटांबाबतचा निर्णय संसदीय मंडळ घेते. “पक्षाच्या तिकिटासाठी कोणीही दावा करू शकतो. हा निर्णय शेवटी पक्षाच्या संसदीय मंडळाने घेतला आहे, स्थानिक पातळीवर नाही. मी नुकतीच त्यांना (उत्पल पर्रिकर) भेटलो, आम्ही तिकीटाबाबत काहीही चर्चा केली नाही,” तानावडे म्हणाले.