पीटीआय, नवी दिल्ली

अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया’च्या विमान दुर्घटनेच्या कारणांची तपासणी करण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी होणार असून तीन महिन्यांत त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे, असे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी शनिवारी सांगितले.

विमान अपघात तपास विभागाच्या (एएआयबी) नेतृत्वाखाली या अपघाताचा तपास आधीच सुरू आहे. मात्र एएआयबीचा तपास तांत्रिक आणि विशिष्ट आहे, तर सरकारची उच्चस्तरीय समिती अधिक समग्र दृष्टिकोनातून तपास करेल आणि विमान वाहतूक सुरक्षा परिसंस्थेला अधिक बळकट करण्याचा विचार करेल, असे नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही समिती अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी जारी केलेल्या विद्यामान मानक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक  तत्त्वांचे परीक्षण करेल आणि भविष्यात अशा घटनांना तोंड देण्यासाठी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे सुचवेल, असेही त्यांनी सांगितले.

गृह सचिव अध्यक्ष असलेल्या या समितीत नागरी विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, गुजरात सरकार, हवाई दल, गुप्तचर विभाग, नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभाग आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयासह इतर विविध विभाग आणि यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती नायडू यांनी दिली. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारी यंत्रणांशिवाय ‘राष्ट्रीय सुरक्षा रक्षक’चे (एनएसजी) एक पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटनमधील अनिवासी भारतीयांनी विमान दुर्घटनेतील पीडितांच्या ब्रिटनमधील कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी निधी संकलनाचे काम सुरू केले आहे.

मृतांची संख्या २७०

विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी २७० वर पोहोचली असून डॉक्टरांनी सांगितले की आतापर्यंत इतके मृतदेह अपघातस्थळावरून अहमदाबाद शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा विभागाने गेल्या २४ तासांत विमान अपघातस्थळावरून एक मृतदेह आणि काही मानवी शरीराचे अवयव जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी यापूर्वी मृतांची संख्या २६५ असल्याचा अंदाज वर्तवला होता. डीएनए नमुने जुळवून मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून सहा मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले असून नातेवाईकांकडे मृतदेह सोपवले जाणार आहेत, असे वैद्याकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरक्षा तपासणीमुळे विमान वाहतुकीस विलंब

●‘एअर इंडिया’ने शनिवारी सांगितले की, त्यांच्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्याची एक वेळ सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. नऊ विमानांची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या निर्देशानुसार उर्वरित २४ विमानांची तपासणी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा तपासणीमुळे काही विमानांच्या उड्डाण वेळेत वाढ होऊन विलंब होऊ शकतो.