Himanta Biswa Sarma allegations on Gaurav Gogoi : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यात समाजमाध्यमांवर वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानी सरकारचं गृह मंत्रालय व आयएसआयच्या निमंत्रणावरून पाकिस्तान दौरा केल्याचा आणि तिथे काही संशयास्पद कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या बाजूला, गोगोई यांनी सरमा यांचे आरोप फेटाळले आहेत. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं वक्तव्य केलं आहे. सरमा ज्या पटकथेनुसार वागत आहेत, बोलत आहेत ती पटकथा बी ग्रेड चित्रपटाहून वाईट असल्याचं गोगोईंनी म्हटलं आहे.

हिमंता बिस्व सरमा म्हणाले, मी पूर्ण जबाबदारीने सांगतो की आसामचे खासदार गौरव गोगोई पाकिस्तानी गृहमंत्रालयाच्या निमंत्रणावर तिकडे गेले, ते तिथे काही दिवस राहिले. त्यांचा हा पाकिस्तान दौरा व त्यांच्या कारवायांची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. आमच्याकडे याबाबतचे दस्तावेजी पुरावे देखील आहेत. १० सप्टेंबरपर्यंत आम्ही जनतेसमोर पुरावे सादर करू.

आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, “गौरव गोगोई पर्यटनासाठी नव्हे तर प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला गेले होते. ही देशासाठी खूप गंभीर बाब आहे. पाकिस्तानी गृहमंत्रालयाकडून त्यांना थेट निमंत्रण मिळणं हा पुरावा आहे की ते पाकिस्तानशी संबंधित आहेत.”

गोगोईंचा पलटवार

दुसऱ्या बाजूला, सरमा यांच्या आरोपांवर गोगोई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मानसिक आरोग्याची चिंता आहे. गेल्या १३ वर्षांपासून ते अशाच पद्धतीने माझ्यावर टीका करत आहे. त्यांनी नेहमीच माझ्यावर खोटेनाटे आरोप केले आहेत. त्यांचे आरोप कधी सिद्ध नाही झाले. २०२६ नंतर आम्ही त्यांच्या भल्यासाठी काम करू.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोगोई म्हणाले, माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बसण्यापेक्षा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आसामच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर आणि कोळसा माफियांकडे लक्ष द्यावं. हिमंता बिस्व सरमा जे काही बोलत आहेत, त्यापैकी ९९ टक्के माहिती चुकीची व फसवी आहे. त्यांनी जगासमोर तथ्य मांडलं पाहिजे. मी ठामपणे सांगतो की सप्टेंबरमध्ये ते कुठल्याही प्रकारची माहिती सादर करू शकणार नाहीत.”