पीटीआय, कोलकाता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणारच आहे. त्याच्या अंमलबजावणीपासून सरकारला कोणीही थांबवू शकत नाही,’’ असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. येथे एका मोठय़ा सभेला संबोधित करताना शहा बोलत होते. या सभेद्वारे शहा यांनी भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा पश्चिम बंगालमध्ये प्रारंभ केल्याचे मानले जात आहे.

 वादग्रस्त ‘सीएए’चा संदर्भ देत शाह म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्याला विरोध करत आहेत, पण त्याची अंमलबजावणी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विरोधी पक्षांच्या या कायद्याला विरोध असताना केंद्र सरकारने अद्याप त्यातील तरतुदींना अंतिम रूप दिलेले नाही. त्यामुळे या कायद्याची मंजुरी अद्यापही प्रलंबित आहे.

यावेळी शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अल्पसंख्याकांचे लांगूलचालन, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचार या मुद्दय़ांवर जोरदार टीका केली. जनतेने ममता यांचे सरकार उलथवून पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून देण्याचे आवाहनही शहांनी केले. सभेस जमलेल्या गर्दीबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त करताना ते म्हणाले, की यातून लोकांचा कल दिसून येतो. पश्चिम बंगालमध्ये २०२६ मध्ये भाजप दोन तृतीयांश बहुमताने राज्यात सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपची कामगिरी विधानसभा निवडणुकीत विजयाचा पाया रचेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इतक्या जागांवर यश मिळवून द्या की मोदीजी म्हणाले पाहिजेत, की मी बंगालमुळे पंतप्रधान झालो आहे. भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. भाजपचे पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीतील हे आतापर्यंतचे सर्वोच्च यश ठरले होते.

हेही वाचा >>>पाकिस्तानात जाऊन फेसबुक मित्रासोबत लग्न करणारी ‘अंजू’ भारतात परतली; भारतीय सीमेत येताच…

शहा यांनी आरोप केला, की ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने गेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका गैरप्रकार-हेराफेरी करून जिंकल्या. पण भाजपने शून्यावरून ७७ जागांवर झेप घेतली. पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या धोरणास अनुकूल सरकार निवडून ‘तृणमूल’च्या भ्रष्टाचार, घुसखोरी आणि राजकीय हिंसाचाराचा अंतर्भाव असलेल्या कुशासनाचा अंत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नवीन फौजदारी कायद्याबाबत ममता बॅनर्जी यांचे गृहमंत्र्यांना पत्र

कोलकाता : नवीन फौजदारी कायद्याबाबत घाई करण्याऐवजी सर्व संबंधितांमध्ये सहमती निर्माण करण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केले. विद्यमान फौजदारी कायद्यामध्ये फेरबदल केल्याने त्याचे राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, असा दावा बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. ‘सध्याचे कायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते न्यायशास्त्राचा पाया आहेत. सध्याच्या कायद्यातील फेरबदल करून त्यांची जागा नवीन कायदे घेणार आहेत. त्याचे दूरगामी परिणाम दिसून येणार आहेत’, असे बॅनर्जी यांनी या पत्रात नमूद केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister amit shah claims that no one can stop the citizenship amendment act amy
First published on: 30-11-2023 at 02:04 IST