पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या विचारांमध्ये रस नाही त्यामुळे चीनमधील एका विद्यापीठात मी आपले विचार मांडण्यासाठी निघालोय, असे राज्यसभा खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. आपल्या या ट्विटद्वारे त्यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारवर आरोप करताना म्हटले की, सरकारला आपल्या विचारांमध्ये रस नाही. त्यामुळे या परिस्थितीत मी चीनला जाऊ शकतो. चीनच्या प्रसिद्ध सिंघुआ विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये मला उच्च विद्याविभुषित लोकांसमोर आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले आहे. यासाठी गेल्या सत्तर वर्षातला चीनचा आर्थिक विकास हा विषय मला देण्यात आला आहे.

स्वामींच्या या ट्विटनंतर काही नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी त्यांना मजेशीर सल्ले द्यायला सुरुवात केली. धर्मा नावाच्या ट्विटर यूजरने म्हटले की, सिंघुआ विद्यापीठाची जागतीक रँक २२ आहे. त्यामुळे स्वामींना इथे लेक्चर घेतल्याने त्याचा त्यांना खूपच फायदा होईल. एकाने म्हटले की, चीनसारखा देश डॉ. सुब्रमण्यम स्वामींची किंमत जाणतो मात्र आपण भारतीय त्यांचे महत्व जाणण्यात कमी पडलो आहोत. दिवे सिंहने म्हटले की, आपल्याला कोणी थांबवलंय, ते काही विशेषाधिकार मिळालेल्या लोकांना सोडून कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.

विकास नामक एका युजरने म्हटले की, पंतप्रधानांबाबत मला माहिती नाही मात्र, भारतीय लोक तुमचे विचार खूपच उत्सुकतेने ऐकतात, मी देखील. याजू महिदा यांनी लिहिले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे ऐकत नसतील तर तुम्ही आपला वेळ वाया घालवू नका. आपण वन मॅन आर्मी प्रमाणे काम करु शकता. मंगेश यांनी लिहीले की, आपण राम मंदिर आणि इतर हिंदूच्या मुद्द्यांवर बोलणे बंद करा तेव्हा नमो खुश होतील.

सुब्रमण्यम स्वामी यांनी अवघ्या २४ व्या वर्षी लंडनच्या हॉवर्ड विद्यापीठातून पीएचडी मिळवली होती. त्यानंतर २७ व्या वर्षी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातच विद्यादानाचे काम सुरु केले. त्यानंतर १९६८ मध्ये त्यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून संशोधनासाठी बोलावणे आले आणि त्यानंतर ते १९६९ पासून आयआयटी दिल्लीतच रमले.