ओडिशामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे सोनिया गांधी?

“ओडिशातल्या बालासोरमध्ये झालेला अपघात हा अत्यंत वेदनादायी आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयासह आहेत.” असं म्हणत सोनिया गांधी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ओडिशा अपघातातील मृतांची संख्या २६१ झाली आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ओडिशामध्ये शुक्रवारी तीन ट्रेन्सचा अपघात झाला आहे. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढते आहे.

नेमकी काय घडली घटना?

ओडिशा राज्यात शुक्रवारी (दि. २ जून) कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेला रेल्वे अपघात हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा अपघात आहे. हा लेख लिहीपर्यंत या अपघातात २३३ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची दुःखद बातमी हाती आली, तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचे कळते. शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस १० ते १२ डबे आणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे तीन-चार डबे ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशनजवळ एकमेकांवर धडकले. या अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिशामध्ये एकदिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. ओडिशामध्ये झालेला अपघात हा मागच्या दोन दशकातील सर्वात मोठा अपघात आहे. १९९९ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची माहिती रेल्वे मंत्रालयात पोहोचल्याच क्षणी लगेच बचावकार्य सुरू करण्यात आले. पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण तपासण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात अनेक मोठ्या अपघातांची नोंद झाली आहे.