आगामी काळात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर, आम आदमी पार्टीने देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सर्व धर्मीयांसाठी घोषणा केली आहे. तसेच, उत्तराखंड आणि पंजाबनंतर आता गोव्यातही मोफत वीज देण्याची घोषणा देखील केजरीवाल यांनी या अगोदर केलेली आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, जर गोव्यात आम आदमी पार्टीची सत्ता आली तर आमचे सरकार हिंदूंसाठी अयोध्येला आणि ख्रिश्चनांसाठी वेलनकन्नी येथे मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करेल. तसेच, मस्लिमांसाठी आम्ही अजमेर शरीफ व साई भक्तांना शिर्डी येथे मोफत दर्शन यात्रा उपलब्ध करून देऊ.

या अगोदर केजरीवाल यांनी दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर असताना, गोव्यात २०२२ विधानसभा निवडणुकीत आपचं सरकार आल्यास ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. गोव्यातील जनतेला आम आदमी पक्षानं चार आश्वासनं दिली आहेत. ही चारही आश्वासनं विजेशी निगडीत आहेत. यावेळी केजरीवाल यांनी काँग्रस आणि भाजपावर निशाणा देखील साधला होता.

“गोवा सुदंर आहे. मात्र इथलं राजकारण खराब आहे. भाजपा आणि काँग्रेसनं मिळून जनतेची फसवणूक केली आहे. आमचं सरकार गोव्यात आलं तर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल. विजेची जुनी बिलं माफ केली जातील. त्याचबरोबर २४ तास वीज उपलब्ध असणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोफत वीज मिळेल. मी तुम्हाला शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळतो”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. होतं.