विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे पार पडत आहे. दरम्यान, ‘इंडिया’ने १३ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्थान दिलं आहे. या बैठकीतून ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार होतं. मात्र, लोगो अनावरणाचा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकललं आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीत ‘या’ नेत्यांचा समावेश
के. सी, वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस)
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष)
एम. के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री)
संजय राऊत (शिवसेना, यूबीटी)
तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री)
अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस)
राघव चढ्ढा (आपचे खासदार)
जावेद खान (समाजवादी पक्ष)
लालन सिंग (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष)
हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)
डी राजा (सीपीआय)
ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते)
मेहबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख)
मुंबईतील बैठकीतून शुक्रवारी ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार होतं. पण सहकारी पक्षाच्या नवीन सूचनांनतर त्यामध्ये बदल करण्यासाठी लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीत या लोगोचं अनावरण होण्याची शक्यता आहे. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरुद्ध लढण्यासाठी सामायिक अजेंडावर निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर ‘सूडाचे राजकारण’ करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘इंडिया’ची लोकप्रियता वाढत असल्याने सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध तपास यंत्रणांचा दुरुपयोग करेल. देशातील शेतकरी, तरुण, महिला, उपेक्षित, मध्यमवर्ग, विचारवंत, स्वयंसेवी संस्था आणि पत्रकारांसह समाजातील प्रत्येक घटकाला भाजपाच्या हुकूमशाही राजवटीचा फटका बसला आहे.