रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जोर बैठका सुरु आहेत. रशियानं युक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सर्व देशांची मतं जाणून घेतली जात आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने ११ व्या आपत्कालीन विशेष सत्राचं आयोजन केलं होतं. या बैठकीत स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.

“रशिया युक्रेन वाद शांततेनं सोडवावा अशी भारताची भूमिका आहे. आमच्या सरकारचा ठाम विश्वास आहे की, डिप्लोमसीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. युक्रेनमध्ये अजूनही अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या तात्काळ आणि तातडीच्या बाहेर काढण्यासाठी भारत जे काही करता येईल ते प्रयत्न करत आहे. या महत्त्वाच्या मानवतावादी गरजेकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे” असं भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितलं. “मी युक्रेनच्या सर्व शेजारी देशांचे आभार मानू इच्छितो, त्यांनी आमच्या नागरिकांसाठी त्यांच्या देशाच्या सीमा खुल्या केल्या आहेत आणि आमच्या नागरिकांना सर्व सुविधा दिल्या आहेत. आमच्या शेजारी देशांना मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत:”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी युक्रेनमधील परिस्थितीचा विषय १९३ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या आकस्मिक सत्रात विचारार्थ पाठवण्यासाठी प्रक्रियात्मक ठरावावर मतदान घेण्यासाठी १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (यूएनएससी) रविवारी दुपारी बैठक झाली होती. भारत, चीन व संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे देश तटस्थ राहिले, तर रशियाने ठरावाच्या विरोधात मत दिले. अल्बानिया, ब्राझील, फ्रान्स, गॅबन, घाना, आर्यलड, केन्या, मेक्सिको, नॉर्वे, ब्रिटन आणि अमेरिका या परिषदेच्या इतर ११ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. युक्रेन प्रश्नावरील ठरावावर भारताने परिषदेत तटस्थ राहण्याची शुक्रवारपासून ही दुसरी वेळ होती.