Karachi Bakery Vandalised: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील कराची बेकरीच्या एका शाखेची तोडफोड केल्याचा आरोप होत आहे. बेकरीच्या मालकांनी दुकानाचे नाव बदलावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, असे तेलंगणा पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजता झालेल्या निदर्शनादरम्यान ही घटना घडली. ही घटना शमशाबाद येथील कराची बेकरीच्या शाखेत घडली.
“बेकरीतील कोणत्याही कर्मचाऱ्यांना इजा झाली नाही. कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही,” असे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. बालाराजू यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. “घटनेच्या काही मिनिटांतच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि राजकीय संघटनेच्या सदस्यांना पांगवलो.”
कराची बेकरी विरोधात निदर्शने होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या आठवड्यात भारत-पाकिस्तान तणाव टोकाला गेला असताना, निदर्शकांनी बेकरीच्या बंजारा हिल्स शाखेत तिरंगा झेंडे लावले होते.
कराची बेकरीचे नाव पाकिस्तानातील कराचीवरून पडले असले तरी, ती एका भारतीय कुटुंबाद्वारे चालवली जाते. कराची बेकरीचे मालक फाळणीच्या वेळी हैदराबादमध्ये स्थलांतरित झालेल्यांचे वंशज आहेत. बेकरीची स्थापना १९५३ मध्ये हैदराबादमधील मोजमजाही मार्केट येथे झाली आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, बेकरीच्या व्यवस्थापकाने सांगितले की, “आम्ही भारतीय आहोत. आमच्यावर पाकिस्तानी असल्याचा आरोप करता येणार नाही.”
कराची बेकरीच्या दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये शाखा आहेत. केवळ हैदराबादमध्येच, बेकरीच्या २४ शाखा आहेत. त्यांचे सर्वात प्रसिद्ध बेक म्हणजे फ्रुट अँड उस्मानिया बिस्किटे आहेत.
शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी निदर्शकांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
यापूर्वी, बेकरी मालक, राजेश आणि हरीश रामनानी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना संरक्षण देण्याची विनंती करणारे निवेदन जारी केले होते. २०१९ मध्ये, पुलवामा हल्ल्यादरम्यान देखील बेकरीची तोडफोड करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
आम्ही भारतीयच आहोत…
दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या सुरुवातीला देखील कराची बेकरी विरोधात त्यांच्या नावावरून आंदोलन झाले होते. तेव्हा पीटीआय या वृत्त संस्थेशी बोलताना हैदराबाद येथील कराची बेकरीचे मालक म्हणाले होते की, “आमचा ब्रँड कराची बेकरी १९५३ पासून हैदराबादमध्ये आहे. आमच्या आजोबांनी हैदराबादमध्येच कराची बेकरीची सुरूवात केली होती. ही बेकरी सुरू होऊन आज ७२ वर्षे झाली आहेत. आम्ही भारतीयच आहोत. आमचं सर्वकाही भारतातच आहे. १९४७ नंतर जेव्हा आमचे आजोबा भारतात आले होते तेव्हा ते तेथून त्यांचं नाव घेऊन आले होते. तेव्हा देखील ते हैदराबादमध्ये होते (सध्या पाकिस्तानात असलेलं हैदराबाद) आणि या हैदराबादमध्ये देखील ते हे नाव घेऊन आले होते”