चिंगडाओ/नवी दिल्ली

भारत आणि चीनने गुंतागुंतीचे मुद्दे रचनात्मक मार्गाने सोडवावायला हवेत. त्यामध्ये सीमा भागांतील तणाव निवळण्याच्या टप्प्यांचा समावेश हवा. तसेच, सीमा निश्चित करण्यासाठी सध्याची यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करायला हवी,’ असा प्रस्ताव संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांच्यासमोर ठेवला. तणाव निवळणे, सैन्यमाघारी, सीमा व्यवस्थापन आणि सीमेची आखणी या मुद्द्यांवर विविध स्तरांवर दोन्ही देशांत चर्चा सुरू ठेवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांत द्विस्तरावर चर्चा झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता राहावी, हा चर्चेचा केंद्रबिंदू होता. ‘दोन्ही देशांना फायदा व्हावा, यासाठी उत्तम शेजारी देश असण्याची स्थिती निर्माण करण्याची गरज आहे. लडाख येथे २०२०मध्ये उद्भवलेल्या सीमावादापासून दोन्ही देशांत तयार झालेले अविश्वासाचे वातावरण भरून निघावे, यासाठी प्रत्यक्ष कृती करावी,’ असे आवाहन भारताने केले आहे. राजनाथसिंह यांनी डोंग यांना ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत थोडक्यात माहिती दिली.

आमच्यामध्ये द्विस्तरावरील संबंधांमधील मुद्द्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. सहा वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू केल्याबद्दल मी आनंद व्यक्त केला. नव्या समस्या तयार न करता दोन्ही देशांमध्ये असे सकारात्मक वातावरण राहण्याची गरज आहे. राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

एस४०० यंत्रणा लवकरात लवकर द्या

नवी दिल्ली : भारतामधील सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान अद्यायावत करणे, हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि उर्वरित एस-४०० क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा भारताला लवकरात लवकर देण्यासंबंधीचे मुद्दे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री अँड्रे बिलोसोव्ह यांच्याशी चर्चा करताना उपस्थित केले. ‘एससीओ’च्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांत द्विस्तरावर चर्चा झाली. भारताकडे जवळपास २६० सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमाने असून, त्यांना कालानुरूप अद्यायावत करण्यात येणार आहे. दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्यावर चर्चा झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेमध्ये संयुक्त जाहीरनाम्यात भारताला दहशतवादाचा संदर्भ हवा होता. मात्र, एका देशाला (पाकिस्तानचा अप्रत्यक्ष उल्लेख) तो संदर्भ मान्य झाला नाही. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भूमिका योग्य आहे. ‘एससीओ’चा मुख्य उद्देशच दहशतवादाविरोधातील लढा हे आहे. त्याच्या संदर्भाशिवाय जाहीरनामा स्वीकारला जाऊ शकत नाही. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री