जागतिक भूक निर्देशांक (global hunger index) २०२१ मध्ये भारत ११६ देशांपैकी १०१ व्या स्थानावर आहे. यामध्ये भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. २०२०मध्ये भारत या यादीत ९४व्या क्रमांकावर होता. एका वर्षात भारत सात स्थानांनी घसरला आहे. आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भुकेची पातळी 'चिंताजनक' असल्याचा उल्लेख केला आहे. भारताच्या शेजारी देशांबद्दल बोलायचं झाल्यास शेजारी देश नेपाळ या अहवालात ७६ व्या क्रमांकावर आहे. तर, बांगलादेश (७६), म्यानमार (७१) आणि पाकिस्तानने ९२ वे स्थान मिळवले आहे. या देशांमध्ये उपासमारीची परिस्थिती चिंताजनक असली तरी भारताशी तुलना केल्यास हे सर्व देश आपल्या पुढे आहेत. या अहवालानुसार नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान सारख्या देशांनी आपल्या नागरिकांना अन्न पुरवण्यामध्ये भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. अहवालात म्हटलंय, की करोनाकाळात लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांचा लोकांवर वाईट परिणाम झाला आहे. त्यात जगातील चाइल्ड वेस्टिंग दर सर्वाधिक आहे. भारतात हा वेस्टिंग दर १९९८ ते २००२ दरम्यान १७.१% वरून २०१६ ते २०२० दरम्यान १७.३% पर्यंत वाढला आहे. तसेच भारताने बालमृत्यू दर, बालमृत्यूचे प्रमाण आणि अपुऱ्या अन्नामुळे मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण, या घटकांमध्ये सुधारणा दाखवली आहे, असं या अहवालात म्हटलंय. महत्वाचं म्हणजे २००० मध्ये भारताचा जागतिक भूक निर्देशांक ३८.८ होता आणि २०१२ ते २०२१ दरम्यान २८.८ ते २७.५ होता. जागतिक भूक निर्देशांकाची गणना करण्यासाठी चार बाबींचे निरीक्षण केले जाते, ज्यामध्ये कुपोषण, मुलांच्या वाढीचा दर, अल्पपोषण आणि बालमृत्यूशी संबंधित आकडे घेतले जातात. या अहवालात, चीन, ब्राझील आणि कुवैतसह १८ देशांनी पाचपेक्षा कमी जागतिक भूक निर्देशांक मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे.