‘बोले तैसा चाले’ या उक्तीची प्रचिती देत जर विकसित राष्ट्रे वाटचाल करणार असतील तर वातावरणीय बदलाच्या आव्हानावर मात करता येऊ शकेल, अशी भूमिका येथे सुरू झालेल्या वातावरणीय बदलविषयक परिषदेत भारताने घेतली. भारताचे वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल खात्यांचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘चिरंतन विकासा’च्या प्रक्रियेशी भारताची असलेली बांधीलकी कायम असल्याची माहितीही या वेळी संयुक्त राष्ट्रांना दिली.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बॅन की मून यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रांमध्ये वातावरणातील बदलांचा वेध घेणाऱ्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातील १२० हून अधिक राष्ट्रांमधील प्रतिनिधी सहभागी झाले असून जावडेकर यांनी भारताची बाजू मांडली.
विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणीसाठी पुरेसे अर्थसाहाय्य मिळवून दिल्यास या समस्येवर ही राष्ट्रे कशी मात करू शकतात, हे आपण पाहिलेच असेल, असे जावडेकर यांनी सांगितले. जगभरात या प्रश्नाबाबत होऊ लागलेली जागृती ही जमेची बाजू असून प्रत्येक देशातर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.