चांद्रयान-१च्या यशानंतर आता भारताने येत्या दोन ते तीन वर्षांत चंद्रावर रोव्हर गाडीसारखे चांद्रयान -२ पाठवण्याचे ठरवले आहे. साधारण २०१७ मध्ये चांद्रयान-२ यानाचे प्रक्षेपण केले जाईल, असे अवकाश सचिव के. राधाकृष्णन यांनी सांगितले. भारताने २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-१ पाठवले होते. हे अवकाशयान चंद्रावर १०० कि.मी. उंचीवर फिरले व त्याने तेथील काही छायाचित्रे पाठवली होती.
चांद्रयान-२ साठी स्वदेशी लँडर व रोव्हर तयार करता येईल किंवा नाही याची चाचपणी केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त त्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे राधाकृष्णन म्हणाले. लँडरमधील काही तांत्रिक बाबी या विकसित कराव्या लागतील, यात प्रथम लँडरचा वेग कमी करून सॉफ्ट लँडिंग करण्यात येईल. लँडरसाठी लागणारी यंत्रणा विकसित करावी लागेल व तिसरे म्हणजे लँडर नेमके कुठे उतरवायचे त्याची जागा नेमकी निश्चित करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चांद्रयान २ हे स्वदेशी बनावटीच्या जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात येणार असून हे यान म्हणजे एक रोव्हर गाडी असेल. त्याच्या मदतीने प्रयोग करण्यात येतील.