Pakistan Ammunition News: पाकिस्तानी लष्कराला महत्त्वाच्या दारूगोळ्याची तीव्र कमतरता भासत आहे, त्यामुळे त्यांनी आपला साठा राखून ठेवण्यासाठी लष्करी सराव तात्पुरते थांबवले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने लष्करी कारवाई सुरू केल्यास, पाकिस्तानकडे युद्धात टिकून राहण्यासाठी चार-पाच दिवस पुरेल इतकाच शस्त्रसाठा आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तराची भीती बाळगून, पाकिस्तान आपले शस्त्रागार अपग्रेड करण्यासाठी त्यांचा मित्र देश चीनची मदत घेत आहे. गुप्तचर अहवालांमधून असे दिसून आले आहे की, पाकिस्तानने आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी चीनकडून ४० व्हीटी-४ टँक आणण्याचा आपत्कालीन आदेश दिला आहे. टाईम्स नाऊने गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानी लष्करी अधिकारी या गंभीर संकटाबद्दल खूप चिंतित आहेत. त्यांनी २ मे रोजी झालेल्या विशेष कॉर्प्स कमांडर्स परिषदेत या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती, गुप्तचर सूत्रांनी टाइम्स नाऊला दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानने मागितली चीनकडून मदत
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलीकडेच चीनचे राजदूत जियांग झाडोंग यांची भेट घेऊन भारतासोबतच्या वाढत्या तणावाबाबत चर्चा केली होती. यासह त्यांनी चीनकडे लष्करी मदतही मागितली होती. सध्या पाकिस्तानकडे ३५० व्हीटी-४ टँक आहेत. पाकिस्तानला भीती आहे की, भारतासोबतच्या जमिनीवरील युद्धात त्यांचे टँक भारतीय शस्त्रांचा सामना करू शकणार नाहीत.
भारताची लष्करी ताकद पाकिस्तानपेक्षा जास्त
पाकिस्तानच्या तुलनेत, भारतीय सैन्याकडे १,००० हून अधिक टी-९० टँक, टी-७२ आणि स्वदेशी अर्जुन टँक आहेत. नाग एटीजीएमचा आधीच भारतीय सैन्यात समावेश करण्याल आला आहे आणि लवकरच अमेरिकन जेव्हलिन एटीजीएमचा देखील समावेश होणार आहे. जर भारताने पाकिस्तानबरोबर जमिनीवरील युद्ध करण्याचा निर्णय घेतला तर ही शस्त्रे पाकिस्तानी टँक सहजपणे नष्ट करू शकतात.
चीनकडून पाकिस्तानला ८२ टक्के शस्त्रसाठा
या तणावाच्या वातावरणात भारताच्या लष्करी सामर्थ्याशी बरोबरी करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. संघर्ष, शस्त्रास्त्रे, शस्त्रास्त्र नियंत्रण आणि निःशस्त्रीकरण या विषयांवर संशोधन करणारी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, २०१९-२०२३ पर्यंत पाकिस्तानच्या एकूण साठ्यापैकी चीनमधून ८२ टक्के आयात करण्यात आली होती. जी २००९-२०१२ मध्ये ५१% होती.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणी
दरम्यान पाकिस्तानने आज (शनिवारी) ४५० किमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. भारताने या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी याला “चिथावणीखोर” कृत्य म्हटले आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पाकिस्तानने त्यांच्या निर्धारित जबाबदाऱ्या आणि नियमांनुसार क्षेपणास्त्र चाचणी करण्याच्या योजनेबद्दल भारताला पूर्वकल्पना दिली होती.