Indian Army Mock Drill in 4 Border States : पाकिस्तानला लागून असलेल्या राज्यांमध्ये गुरुवारी (२९ मे) सायंकाळी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात या चार राज्यांमध्ये हे मॉक ड्रिल केलं जाईल. या दरम्यान, लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जाऊ शकतो. केंद्र सरकारने सिव्हिल डिफेन्स सर्व्हिसेसना (नागरी सुरक्षा सेवा जसे की, अग्निशमन दल, बचाव पथके) या चार राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला आहे.

भारत पाकिस्तानबरोबर ३,३०० किलोमीटरची सीमा शेअर करतो. जम्मू काश्मीरमधील उभय देशांमधील सीमा रेषेला नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी म्हटलं जातं. तर पंजाब, राजस्थान व गुजरातमधील उभय देशांमधील सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) म्हटलं जातं. या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने कुरापती चालू आहेत. पाकिस्तानी लष्कराने अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. दोन्ही देशांमधील तणावामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशा स्थितीत या राज्यांमध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त, १०० दहशतवादी ठार

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलं होतं. तेव्हा देखील भारत सरकारने देशभर मॉक ड्रिल घेतले होते. ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं होतं. मात्र, ६ व ७ मे च्या रात्री भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं होतं. मात्र भारताच्या सीमेपासून जवळ पाकिस्तानी भूमीवर १२ दहशतवादी तळ अजूनही चालू आहेत. हे दहशतवादी तळ सध्या भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत. यासाठी भारतीय लष्कर मोहीम राबवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानच्या मनात दहशत

भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तान सध्या दहशतीखाली आहे. भारत पुन्हा एकदा एका बाजूला मॉक ड्रिल आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानवर हल्ला तर करणार नाही ना? असा प्रश्न पाकिस्तानी जनतेला पडला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केल होते. आता उर्वरित १२ तळ उद्ध्वस्त करण्याचा भारतीय लष्कराचा मनसुबा असू शकतो. कारण भारताने यापूर्वीच म्हटलं आहे की पाकिस्तानमधी उरलेसुरले दहशतवादी तळ देखील उद्धवस्त केले जातील.