India-Pakistan Conflicts: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेल्या प्रत्युतरानंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. याचबरोबोर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारताने अनेक कठोर पाऊले उचलली आहे. याचाच भाग केंद्र सरकारने सिंधू जल करार स्थगित केला आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याच्या रागातून दुबईमध्ये २६ वर्षांचा भारतीय तरुणाचा पाकिस्तानी तरुणांनी छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील किच्छा येथील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय विशाल दुबईमध्ये पाकिस्तानी तरुणांच्या द्वेषाचा बळी ठरला. दुबईमध्ये पाकिस्तानी तरुणांनी विशालला अनेक दिवस उपाशी ठेवले याचबरोबर त्याला प्यायला पाणीसुद्ध दिले नाही. विशालला मारहाणीसह त्याचा पासपोर्ट हिसकावण्यासारखे क्रूर प्रकारही सहन करावे लागले. उधम सिंह नगरचे पोलीस अधिक्षक मणिकांत मिश्रा यांच्या तत्परतेमुळे विशालची दुबईमधून सुटका करण्यात आली आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला विशाल नोकरीसाठी ८ मे २०२५ रोजी दुबईला गेला होता. त्याला एजंट समीर अहमदने नोकरीचे आमिष दाखवून तिथे पाठवले होते. तिथे विशालला काही पाकिस्तानी तरुणांसोबत एका कंपनीत काम करायचा. पण भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती आणि भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याने संतप्त झालेल्या या पाकिस्तानी तरुणांनी विशालवर आपला राग काढला आणि त्याचा मानसिक व शारिरीक छळ केला.
दरम्यान विशालने फोनवर रडत रडत आईला त्याला होत असलेला त्रास सांगितला. त्यानंतर त्याच्या आईने ताबडतोब पोलीस अधिक्षक मणिकांत मिश्रा यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी विशालला दुबईमध्ये होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. यानंतर पोलीस अधिक्षकांनी ताबडतोब एजंट समीर अहमदला बोलावून त्याची चौकशी केली. पोलिशी खाक्या दाखवल्यानंतर त्याने विशालचा पासपोर्ट परत केला. पोलीस अधिक्षकांनी दुबईतील त्याच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला आणि विशालला सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था केली.
अनेक प्रयत्नांनंतर, १४ मे २०२५ रोजी विशाल त्याच्या घरी किच्छा येथे सुखरूप परतला. घरी पोहोचल्यानंतर, विशाल आणि त्याच्या आईने पोलीस अधिक्षक मणिकांत मिश्रा यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. विशालने पोलिसांना सांगितले की, तो दुबईत फक्त एक आठवडा राहिला, परंतु त्या काळात त्याला भयंकर छळ सहन करावा लागला.