मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून अंदमान तुरुंगात असलेल्या वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली होती असे म्हटले होते. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद उफाळून आला आहे. या विधानाबाबत काँग्रेस पक्षाकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यापुर्वी अनेकवेळा कॉंग्रेसने सावरकरांवर ब्रिटिशांची माफी मागण्याचा आरोप करत आला आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा वाद समोर आला आहे. या पार्श्वभूमीर एक जुनं पत्र चांगलच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इंदिरा गांधींनी वीर सावरकरांचे कौतुक केले आहे.
“सावरकरांविरोधात खोटे बोलले गेले. त्यांनी वारंवार ब्रिटिशांची माफी मागितली असे सांगितले गेले, पण सत्य हे आहे की त्यांनी स्वतःला क्षमा करण्यासाठी दया याचिका दिली नाही. महात्मा गांधींनी त्यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते. महात्मा गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी ही याचिका दिली होती. महात्मा गांधींनी सावरकरांना सोडून द्यावे असे आवाहन केले होते. पण त्यांना बदनाम करण्यासाठी, त्यांनी माफी मागितली असे सांगितले जाते, जे पूर्णपणे निराधार आहे,” असे राजनाथ सिंह यांनी म्हटले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला.
काँग्रेसने केली होती टीका
काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला होता. सावरकर तुरुंगात असताना त्यांनी महात्मा गांधींशी संवाद कसा साधला?, असे ते म्हणाले होते. असेच शाब्दीक युद्ध दोन वर्षांपूर्वी काँग्रेस-भाजपामध्ये सावरकरांवर रंगले होते, त्यावेळी भाजपा नेते जितेंद्र सिंह यांनी इंदिरा गांधींचे एक जुने पत्र ट्विट केले होते. ज्यात इंदिरा गांधींनी सावरकरांची स्तुती केली होती. तसेच २०२० मध्ये भाजपाचे फायरब्रँड नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील हे पत्र ट्वीट करत काँग्रेसवर निशाणा साधला होता.
इंदिरा गांधींनी सावरकरांना म्हटले होते भारताचे विशेष पुत्र
इंदिरा गांधींनी १९८० मध्ये सावरकरांची स्तुती केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर नॅशनल मेमोरियल सोसायटीचे सचिव पंडित बखले यांना लिहिलेल्या पत्रात इंदिरा गांधींनी सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या योजना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच वेळी, त्यांनी सावरकरांचे फक्त भारताचे प्रतिष्ठीत पुत्र म्हणून वर्णन केले नाही तर ब्रिटिश सरकारशी त्यांच्या निर्भय संघर्षाचे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात स्वतःचे महत्त्वाचे स्थान आहे, असेही म्हटले होते. सावरकरांवर ‘द ट्रू स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्वा’ हे पुस्तक लिहिणारे लेखक वैभव पुरंदरे यांनीही काही वर्षांपूर्वी या पत्राच्या विश्वासार्हतेची पुष्टी केली होती.
राहुल गांधींनी केले होते आक्षेपार्ह विधान
२०१९ मध्ये, दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित काँग्रेसच्या ‘भारत बचाओ रॅली’मध्ये राहुल गांधींनी सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. राहुल यांनी तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना बब्बर सिंह म्हणून संबोधित केले होते. काँग्रेस कार्यकर्ता कुणाला घाबरत नाही. माझे नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. मी मरेन पण सत्यासाठी माफी मागणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.