वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील प्राध्यापिका निताशा कौल यांना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी बोलावले होते. परंतु, केंद्र सरकारने त्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारल्यानंतर त्यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले आणि लंडनला परत पाठवले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

निताशा कौल या एक लेखिका असून युके विद्यापीठातील राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागातील प्राध्यापक आहेत. त्यांना संविधान आणि राष्ट्रीय एकता अधिवेशन या काँग्रेसकडून कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे, राज्याच्या समाज कल्याण विभागातर्फे आयोजित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजकल्याण मंत्री एचसी महादेवप्पा यांनी त्यांना पाठवलेल्या निमंत्रणाची प्रत आणि कार्यक्रमासाठी त्यांच्या नोंदणीचे तपशील शेअर करताना त्यांनी ऑनलाइन पोस्ट केले, “आम्ही काहीही करू शकत नाही, दिल्लीचे आदेश’ याशिवाय इमिग्रेशनने कोणतेही मला कारण दिले नाही. माझ्या प्रवासाची आणि लॉजिस्टिकची व्यवस्था कर्नाटकने केली होती आणि माझ्याकडे अधिकृत पत्र होते. मला दिल्लीतून कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती मिळाली नाही की मला प्रवेश दिला जाणार नाही.

हेही वाचा >> कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे? भाजपाने शेअर केला VIDEO

द इंडियन एक्स्प्रेसने महादेवप्पा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “मला याबाबत कल्पना नाही. मी कार्यक्रम आयोजित करण्यात व्यस्त होतो.” रविवारच्या समारोप समारंभात काँग्रेस नेत्यांशिवाय अनेक खासदार सहभागी झाले होते. मुख्यमंत्री कार्यालयानेही या प्रकरणावर भाष्य केले नाही.

निताशा कौल या दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी “प्रतिष्ठित प्रतिनिधी” म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्या शुक्रवारी सकाळी त्या भारतात उतरल्या आणि शनिवारी सकाळी दुसऱ्या थेट फ्लाइटने त्यांना परत पाठवण्यात आले, असं इंडियन एक्स्प्रेसने म्हटलं आहे. नितीशा कौल यांच्याकडे OCI (भारताचे ओव्हरसीज सिटिझनशिप) आहे.

निताशा कौल काय म्हणाल्या?

“मला औपचारिकपणे कळवण्यात आले होते की मला दिल्लीच्या सूचनांनुसार परत पाठवले जात आहे, परंतु त्यांनी त्यांना सूचना देणाऱ्या संस्थेचे नाव उघड केले नाही आणि हे मला लिखित स्वरूपातही दिले गेले नाही. शिवाय, मला परत पाठवण्याचे कारण दिले गेले नाही. मला जे काही मिळाले ते एअरलाइन्सना उद्देशून लिहिलेले पत्र होते, ज्यात मला परत यूकेला नेण्याची विनंती केली होती, कारण मला देशात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. इमिग्रेशन अधिकारी विचारत राहिले की मी तीच आहे जी आरएसएसवर टीका करत आहे आणि ते माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे”, अशी माहिती निताशा कौल यांनी दिली.

“लोकशाही अशी चालत नाही. हे चीन नाही. मला परत पाठवण्यामागची मी कारणे मागितली. पण कारणे दिली गेली नाहीत. मी अनेकदा भारतात आले आहे. पण हे असं पहिल्यांदाच घडतंय. कारण, मी विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात आयोजित एका कार्यक्रमात जात होते”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

आणखी पाच-सहा थांबवले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्फरन्स आयोजकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी त्यांच्याकडून दिल्लीलाही फोन केला गेला. परंतु, हे प्रयत्न व्यर्थ ठरले. प्रवेशासाठी मदत करण्यासाठी नवी दिल्लीला फोन केला, परंतु व्यर्थ. “इतर देशांतील पाच-सहा प्रतिनिधींना देखील विमानतळावर थांबवण्यात आले होते. परंतु, आम्ही हस्तक्षेप करून त्यांच्या प्रवेशासाठी मदत करू शकलो. पण डॉ कौलला आणण्याचे आमचे प्रयत्न निष्फळ ठरले”, अशीही माहिती एकाने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली.

कौल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असाही आरोप केला आहे की, लंडनहून बेंगळुरूला उतरल्यानंतर त्यांना इमिग्रेशनमध्ये अनेक तास थांबायला लावले होते. तसंच, २४ तास प्रतिबंधित हालचालींसह होल्डिंग सेलमध्ये ठेवण्यात आले होते. तसंच, त्यांना अन्न आणि पाणीही देण्यात आले नाही. उशी-ब्लँकेटसारख्या मूलभूत सुविधाही पुरवल्या गेल्या नाहीत.

भाजपाची टीका काय?

“कर्नाटक करदात्यांच्या खर्चावर, काँग्रेस सरकार निवडणुकीपूर्वी भारत अस्थिर करण्यासाठी दहशतवादी-सहानुभूती, शहरी नक्षलवादी , देशद्रोही, दंगल-आरोपी यांना निधी पुरवत आहे. आमच्या सुरक्षा एजन्सींचे आभार, अशाच एका भारतविरोधी घटकाला संशयास्पदरीत्या भारतात प्रवेश करताना पकडण्यात आले आणि विमानतळावर ताब्यात घेण्यात आले,” असे भाजपच्या राज्य युनिटने ऑनलाइन पोस्ट केले.