Iran VS Israel War : गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल आहेत, तर इराणनेही इस्रायलला प्रत्युत्तर देत हवाई हल्ले केले आहेत. सध्या या दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलने इराणच्या विरोधात ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ राबवत केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत इराणमध्ये २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच इस्रायलने इराणवर हवाई हल्ले करताना इराणमधील तेल डेपो, गॅस रिफायनरी प्रकल्प देखील लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केलं असून इराणनेही इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या दोन्ही देशांतील संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस होत असल्याचं समोर येत आहे. आता सोमवारी सकाळी इराणने इस्रायलवर पुन्हा एकदा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. यात इराणच्या सैन्याने इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर येत आहे.
इराणने इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात शुक्रवारपासून इस्रायलमध्ये किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सध्याही सुरु असून दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती आहे.
भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
इराण आणि इस्त्रायलमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्षामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण-इस्रायल संघर्ष वाढल्याने भारताने अलर्ट होत तेथील आपल्या नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच इराणमधील भारतीयांबाबत भारतीय दूतावासांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने रविवारी या प्रदेशातील भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय दूतावासाने आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करून भारतीय नागरिक आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधू शकतात अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.