जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम रद्द केल्याने बदलाचे वारे वाहत असताना आता शैक्षणिक संस्था काश्मीरमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सात प्रसिद्ध शैक्षणिक संस्था लवकरच काश्मीरमध्ये कॉलेज सुरु करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये फर्ग्युसन व व्हीआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. या कॉलेजच्या व्यवस्थापनाने सरहद या पुण्यामधील स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधत आपण काश्मीरमध्ये कॉलेज सुरु करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आहे.
सरहद ही स्वयंसेवी संस्था गेल्या दोन दशकांपासून जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसंच शिक्षणासाठी काम करत आहे. ३७० कलम रद्द करण्यात आल्यापासून केंद्र सरकार खोऱ्यात खासगी कंपन्या गुंतवणूक करतील आणि यामुळे आर्थिक पाठबळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.
सरहदचे प्रमुख संजय नाहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही २००४ पासून प्रयत्न करत आहोत. मुफ्ती मोहम्मद सईद सरकारकडे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनी कॉलेज सुरु करावीत यासाठी आम्ही जमीन मागितली होती. त्यावेळी मुख्यमंत्री मुफ्ती सईद यांनी फर्ग्यूसन, सिम्बॉयसिस सारख्या संस्थांना जमीन देण्यासाठी तयारी दर्शवलीही होती. पण त्यावेळी संस्था इच्छुक नव्हत्या”.
“आम्ही पुन्हा एकदा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधला. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज, व्हीआयटी, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, गरवारे कॉलेज, एस पी कॉलेज, अरहम आणि इतर संस्थांचा समावेश आहे. काश्मीर आणि कारगिलमध्ये त्यांनी शाखा सुरु करावी असं आवाहन आम्ही केलं. यापैकी व्हीआयटी, अरहम अशा एकूण सात जणांनी खोऱ्यात कॅम्पस सुरु करण्यासाठी तयारी दर्शवली आहे”, असं संजय नाहर यांनी सांगितलं आहे.
व्हीआयटी विद्यापीठाचे डॉ वासुदेव गाडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काश्मीरमध्ये कॉलेज सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही सकारात्मक असून लवकरात लवकर काम सुरु करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जास्तीत जास्त जागा काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील आणि इतर जागा देशभरातील विद्यार्थ्यांसाठी असतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अरहम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शैलेश पगारिया यांनीदेखील आपण कॅम्पस सुरु करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. पुढील वर्षी खोऱ्यात कॅम्पस सुरु करण्यास आम्हाला आवडेल असं त्यांनी सांगितलं आहे. काश्मीरमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं त्यांनी म्हटलं आहे.