जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील कामकारी सेक्टर येथे शनिवारी पाकिस्तानी सैन्याच्या ‘बॉर्डर अॅक्शन टीम’ (बीएटी) या तुकडीने केलेला हल्ला भारतीय लष्कराने उधळून लावला. यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, एका कॅप्टनसह चार जण जखमी झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.

लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक पाकिस्तानी घुसखोर ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, दोन घुसखोर पाकव्याप्त काश्मीरमध्ये परत पळून जाण्यात यशस्वी झाले. लष्कर आणि बीएटीदरम्यान ही चकमक अनेक तास चालली. ‘बीएटी’मध्ये सामान्यत: पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचे सैनिक आणि दहशतवादी यांचा समावेश असतो. ठार झालेल्या घुसखोराची ओळख पटविली जात आहे.

संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, खराब हवामान आणि वाईट दृश्यमानतेचा फायदा घेऊन घुसखोरांनी त्रेहगाम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडली आणि सैन्याच्या छावणीवर जवळून गोळीबार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन घुसखोरांनी एक ग्रेनेड फेकला आणि गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एका कॅप्टनसह पाच सैनिक जखमी झाले. त्यापैकी एक जवान नंतर शहीद झाला. इतर जखमी जवानांवर श्रीनगरच्या बेस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> Bangladeshi Youtuber Viral Video: भारतात अवैधरीत्या कसं शिरायचं, बांगलादेशी यूट्यूबरच्या व्हिडीओमुळे खळबळ; नेटिझन्सकडून कारवाईची मागणी!

मुफ्तींचे संयुक्त समितीचे आवाहन

श्रीनगर : जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केले. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) २५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना, ‘‘अमित शहा आम्हा मुस्लिमांना पाकिस्तानात जायला सांगतात आणि पाकव्याप्त काश्मीरला परत आणणार असल्याचे म्हणतात,’’ अशी टीका त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने

गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी जम्मू विभागाला लक्ष्य केले आहे. जानेवारीपासून राजोरी, पूंछ, रियासी, उधमपूर, कथुआ, दोडा या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ सुरक्षा सैनिक शहीद झाले असून एका ग्राम संरक्षकासह ११ नागरिकांचा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या पाठवण्यात येत आहेत. या दोन्ही तुकड्यांनी यापूर्वी नक्षलविरोधी मोहिमांमध्ये सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले.