नवी दिल्ली : उत्तराखंडमधील जोशीमठ हे शहर केवळ १२ दिवसांत ५.४ सेंटिमीटर इतक्या जलद वेगाने खचल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांतून दिसून आले आहे. २ जानेवारीला भूपृष्ठ खचण्याच्या घटनेमुळे असे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बद्रीनाथ व हेमकुंड साहिब यांसारखी तीर्थस्थळे आणि औली हे आंतरराष्ट्रीय स्कीइंग स्थळ यांचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठपुढे जमीन खचण्यामुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जमीन खचण्याची गती कमी होती व या काळात जोशीमठ ८.९ सेंटिमीटरने खचले, असे इस्रोच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राच्या (एनआरएससी) प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र २७ डिसेंबर २०२२ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत भूपृष्ठ खचण्याची तीव्रता वाढली आणि केवळ १२ दिवसांत हे शहर ५.४ सेंटिमीटरने खचले. याची छायाचित्रे काटरेसॅट-२ एस उपग्रहामार्फत घेण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘काही दिवसांच्या कालावधीतच हा भाग सुमारे ५ सेंटिमीटरने खचला आणि खचण्याच्या क्षेत्रव्याप्तीचे प्रमाणही वाढले. मात्र हे जोशीमठ शहराच्या मध्यवर्ती भागापुरते मर्यादित आहे’, असे अहवालात नमूद केले आहे. या खचण्याच्या प्रकाराचे शिखर जोशीमठ- औली मार्गावर २१८० मीटर उंचीवर स्थित असल्याचेही अहवालात म्हटले आहे.