Kailash Vijayvargiya : भाजपा नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एक वक्तव्य केलं आहे जे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. महिलांनी तोकडे कपडे घालू नये. तोकडे कपडे घातलेल्या महिला चांगल्या दिसत नाहीत असं म्हटलं आहे. कैलाश विजयवर्गीय असंही म्हणाले की तोकडे कपडे घातलेल्या मुलींसह, महिलांसह मी फोटोही काढत नाही.
काय म्हणाले कैलाश विजयवर्गीय?
मध्य प्रदेश सरकारमध्ये कैलाश विजयवर्गीय कॅबिनेट मंत्री आहेत. इंदूर या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात कैलाश विजयवर्गीय म्हणाले, “परदेशात एक म्हण वापरली जाते.. ती म्हण तुम्हाला सांगत नाही कारण ती गलिच्छ आहे. पण विदेशात म्हटलं जातं तोकडे कपडे घातलेली महिला सुंदर दिसते, तसाच कमी भाषण देणारा नेता चांगला असतो. विदेशात हे म्हटलं जात असलं तरीही मी असल्या म्हणी वगैरे मानत नाही. महिलांनी तोकडे कपडे मुळीच घालू नयेत. त्यांनी चांगले, शोभणारे कपडे घातले पाहिजेत. तोकडे कपडे घालणाऱ्या महिला शूर्पणखेसारख्या दिसतात” असंही कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
मी तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींना सेल्फी देत नाहीत-कैलाश विजयवर्गीय
कैलाश विजयवर्गीय म्हणाले, तोकडे कपडे घालणाऱ्या महिला चांगल्या दिसत नाहीत. मी जेव्हा कुठे कार्यक्रमांमध्ये वगैरे जातो तेव्हा तोकडे कपडे घालणाऱ्या महिला किंवा मुली माझ्यासह सेल्फी काढायला येतात. पण मी त्यांच्यासह सेल्फी काढत नाही. भारतातल्या मुली, महिलांनी चांगले कपडे घातले पाहिजेत. त्यांनी सुंदर कपडे घालावेत, चांगला साज शृंगार करावा, छान दागिने घातले पाहिजेत. तोकडे कपडे घालणाऱ्या मुली, महिला चांगल्या दिसत नाहीत. विदेशात तोकडे कपडे घालणाऱ्या मुली चांगल्या दिसतात असं म्हटलं जातं पण ती त्यांची विचारधारा आहे असंही कैलाश विजयवर्गीय म्हणाले. ज्या महिला तोकडे कपडे घालतात त्या शूर्पणखेसारख्या दिसतात असंही कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
तृणमूल काँग्रेसची जोरदार टीका
कैलाश विजयवर्गीय यांनी केलेलं वक्तव्य भाजपाच्या मंत्र्याने केलं आहे. कायमच हे कैलाश विजयवर्गीय वादग्रस्त वक्तव्य करत असतात. या मंत्री महाशयांनी केलेलं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना मान्य आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे. तसंच या प्रकरणी तातडीने कारवाई केली पाहिजे असंही तृणमूल काँग्रेसने म्हटलं आहे.