नवी दिल्ली:  भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व अभिनेत्री कंगना राणौत यांच्याविरोधात काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्या एक्स हॅण्डलवरून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानावरून भाजप मंगळवारी आक्रमक झाला. काँग्रेस महिला मतदारांचा अपमान करत असला तरी भाजप ‘नारीशक्ती’च्या हिताला प्राधान्य देत असल्याच्या प्रचारावर भर दिला जाणार आहे.

काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी राणौत यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह विधान एक्स हॅण्डलवरून काढून टाकले आहे. ‘एक्स’वरील हॅण्डलचा गैरवापर झाला असून ते हॅक करून संबंधित विधान अपलोड केल्याचा दावा श्रीनेत यांनी केला आहे. श्रीनेत यांच्या नावाने असलेल्या पॅरोडी हॅण्डलवरून हा प्रकार घडल्याचेही श्रीनेत यांचे म्हणणे आहे. या प्रकरणापासून श्रीनेत यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी, भाजपच्या नेत्यांकडून चहुबाजूने त्यांना मंगळवारी लक्ष्य केले गेले. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली असून या प्रकरणावरून भाजपला आणखी कोलित मिळू नये यासाठी काँग्रेसचे नेते श्रीनेत यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश, राष्ट्रीय प्रवक्ता पवन खेरा यांनी श्रीनेत यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. श्रीनेत यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाण्याची शक्यता नाही. मात्र, या प्रकरणाची काँग्रेसने दखल घेतली असून पक्षांतर्गत चर्चा झाल्याचे समजते.

priyanka gandhi
‘महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवा’
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : वरुण गांधी यांना अमेठीतून काँग्रेसची उमेदवारी?

काँग्रेसमधील काही नेत्यांनी कंगना राणौत व भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी एक्स हॅण्डलवर राणौत यांनी काँग्रेसच्या पूर्वाश्रमीच्या नेत्या व अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा दाखला देत ‘हे योग्य आहे का’, असा प्रश्न उपस्थित केला.

या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे पत्रही आयोगाने पाठवले आहे. कंगना राणौत यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधानाची आयोगाने दखल घेण्याची मागणी भाजपने केली आहे.

‘प्रत्येक महिलेला सन्मानाने वागविण्याचा अधिकार’

शिमला : पार्श्वभूमी कोणतीही असो, प्रत्येक महिलेला सन्मानाने वागवण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणौत यांनी  दिली. मंडीबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे आपण दुखावल्याचेही सांगितले. लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी दिली.  एका महिलेचा व्यवसाय कोणताही असो, ती शिक्षिका असो, अभिनेत्री, पत्रकार किंवा राजकारणी किंवा देहविक्रय करणारी महिला असो, प्रत्येकीला सन्मानाने वागणूक देण्याचा अधिकार आहे असे स्पष्ट केले. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक्सवर पोस्ट केले की देवभूमी हिमाचलची कन्या कंगना हिच्याविरोधात काँग्रेसच्याच महिला नेत्याने केलेली टिप्पणी दुर्दैवी आहे.

कारवाईत सातत्य का नाही? -विनोद तावडे     

लोकसभा निवडणूक अजून सुरूही झालेली नाही पण, वेगवेगळया राज्यांमध्ये आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. त्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईमध्ये मात्र सातत्य नसल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला. यासंदर्भात विनोद तावडे व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची मंगळवारी भेट घेतली. कर्नाटकमध्ये केंद्रीय मंत्री शोभा करंदळजे यांच्या विधानावर आयोगाने तातडीने कारवाई केली. तमिळनाडूमध्ये ‘द्रमुक’च्या नेत्यावर मात्र कारवाई झाली नाही. केरळ, पश्चिम बंगाल, पंजाबमध्येही कारवाईंमध्ये भेदभाव झाल्याचे दिसत आहे. हा भेदभाव केला जात आहे, असा सवाल तावडे यांनी केला.