काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली. यानंतर आता त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केलीय. यानुसार काँग्रेस सत्तेत आल्यास विद्यार्थीनींना स्मार्टफोन आणि स्कुटी देण्यात येणार आहे.

याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी, २० लाख लोकांना सरकारी नोकरी आणि कोविडमुळे सदस्य गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपये देण्याचं आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिलंय. यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय आखाड्यात या आश्वासनांची जोरदार चर्चा आहे.

गहु, तांदुळ आणि उसाला हमीभावासह वीज बिल निम्म करण्याची घोषणा

काँग्रसने तांदूळ आणि गव्हाला प्रति क्विंटल २ हजार ५०० रुपयांच्या हमीभावाचं आणि उसाला प्रति क्विंटल ४०० रुपयांचं आश्वासनही दिलंय. याशिवाय सत्तेत आल्यास काँग्रेस वीज बिल निम्म केलं जाईल, अशीही घोषणा काँग्रेसने केलीय. एकूणच काँग्रेसच्या या घोषणांच्या पावसानं उत्तर प्रदेशचं राजकारण ढवळून निघणार असंच दिसतंय.

“काँग्रेस उत्तर प्रदेश निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार”

प्रियंका गांधी यांनी १९ ऑक्टोबरल घोषणा केली होती, “उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ४० टक्के तिकीट महिलांना देईल. महिलांचा उत्तर प्रदेशमधील राजकारणात पूर्णपणे सहभाग व्हाव्यात अशीच आमची प्रतिज्ञा आहे.”

हेही वाचा : योगी आदित्यनाथ यांच्या ‘त्या’ विधानानंतर प्रियांका गांधींनी पुन्हा हातात घेतला झाडू! म्हणाल्या, “त्यांनी फक्त…!”

प्रियंका गांधी निवडणूक मैदानात उतरणार? मतदारसंघ कोणता?

प्रियंका गांधी यांना रायबरेली किंवा अमेठीतून निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रियंका गांधींनी एक ना एक दिवस निवडणूक लढावीच लागणार आहे, असं उत्तर दिलं. यावेळी त्यांनी निवडणूक लढणार की नाही यावर निर्णय झालेला नसल्याचंही नमूद केलं. तसेच पुढील घटना कशा घडतात यावर निर्णय होईल, असं सूचक विधान केलं.