बिहारमध्ये जदयू आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत आणि नितीशकुमार यांनीच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. अशात राजद आणि जदयू यांच्यातली शाब्दिक चकमक थांबताना दिसत नाहीये. नितीशकुमार स्वार्थी नेते आहेत त्यांनी आम्हाला स्वार्थ साधू नका ही अक्कल शिकवू नये असं खरमरीत प्रत्युत्तर लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांना दिलं आहे. लालूप्रसाद यादव यांनी स्वार्थ सोडावा असा सल्ला नितीशकुमार यांनी दिला होता त्याला आता लालूप्रसाद यादव यांनी तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाहीतर बिहारच्या भागलपूरच्या जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार या दोघांचेही हात बरबटले आहेत असाही आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर राहण्यासाठी लालूप्रसाद यादव आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, नितीशकुमार यांनी आधी स्वतःचा स्वार्थ सोडावा, त्यानंतर इतरांना सल्ले द्यावेत असा टोला लालूप्रसाद यादव यांनी लगावला आहे. बिहारमध्ये जो भागलपूर जमीन घोटाळा झाला त्याचा फायदा नितीशकुमार आणि सुशील मोदी या दोघांना झाला आहे. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा कारवाईचं आणि चौकशीचं नाटक करण्यात आलं, पुढे ती फाईल बंद करण्यात आली असंही यादव यांनी म्हटलं आहे. तसंच बिहारमध्ये आता निवडून आणि ठरवून राजदच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हत्या करण्यात येत आहे असा गंभीर आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. राजद नेता केदार रायची हत्या करण्यात आली त्यामागेही जदयूचा हात असू शकतो असंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये जे राजकीय नाट्य घडलं त्याचा सर्वाधिक गंभीर परिणाम लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर झाला कारण नितीशकुमार हे भाजपसोबत जातील अशी कल्पनाच यादव यांना नव्हती. आता या सगळ्या राजकीय महाभारतानंतर मात्र दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.