बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी सहायक प्राध्यपक नियुक्तीत  भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीस शिक्षणमंत्री बनवण्यात आल्यावरून, मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपावर निशाणा साधला आहे. लालू यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ”दुर्देवं पाहा जे भाजपावाले कालपर्यंत मेवालालचा शोध घेत होते, आज मेवा मिळाताच त्यांनी मौन बाळगलं आहे.”

तसेच, लालू यांनी देखील असे देखील म्हटले की, तेजस्वी जिथं पहिल्याच कॅबिनेटमध्ये पहिल्या स्वाक्षरीनिशी १० लाख नोकऱ्या देण्यासाठी कटिबद्ध होते. तिथं नितीश यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये नियुक्तीत घोटाळा करणाऱ्या मेवालाल यांना मंत्री बनवून आपली प्राथमिकता दर्शवली आहे.

आणखी वाचा- ७४ वर्षात पहिल्यांदाच बिहारच्या कॅबिनेटमध्ये नाही एकही मुस्लीम मंत्री

आता जेव्हा मुंगेरच्या तारापुर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले जदयू नेत्यास शिक्षणमंत्री बनवण्यात आले आहेत. तर पुन्हा एकदा हे प्रकरण तापले आहे. सर्व विरोधीपक्षांनी हा मुद्दा उचलण्यास सुरूवात केली आहे. सीपीआय एमएलचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांनी देखील म्हटले आहे की, जर मेवालाल चौधरी यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बरखास्त केले गेले नाहीतर, पक्ष आंदोलन करेल. त्यांनी म्हटले की, अशा व्यक्तीस शिक्षण विभाग देण्यात आला आहे, ज्याला कृषि विभागातील घोटाळ्यावरून कधीकाळी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पक्षातून काढले होते.

आणखी वाचा- बिहारचे नवे मंत्रीमंडळ : १२ वी पास अर्थमंत्री तर शिक्षक भरती घोटळ्यातील नेता शिक्षणमंत्री

राजदने देखील हा मुद्दा उचलला आहे. राजदकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भ्रष्टाचारातील आरोपी आणि नितीश कुमार यांचे नवरत्न नवे शिक्षणमंत्री मेवलाल चौधरी यांच्यावर त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा देखील आरोप आहे. जेव्हा माध्यमांनी विचारले तर त्यांचा पीए धमकावू लागला. एनडीएची गुंडागर्दी सुरू आहे, महाजंगलराजचे दिल्लीतील महाराजा गप्प आहेत.
ज्या भ्रष्टाचारी जदयू आमदारास सुशील मोदी शोधत होते. त्याला भ्रष्टाचाराचे भीष्म पितामह नितीशकुमार यांनी मंत्रीपद देऊन गौरवलं आहे. हाच आहे ६० घोटाळ्यांचे रक्षणकर्ते नितीश कुमार यांचा दुटप्पी चेहरा. हा माणूस खुर्चीसाठी कितीही खालच्या पातळीपर्यंत पडू शकतो. असं राजदकडून ट्विट करण्यात आलेलं आहे.