ओदिशातील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा काहीही परिणाम न होता पुन्हा एकदा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने बाजी मारली आहे. ते आता पाचव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. विधानसभेच्या ११७ जागांवर बिजदने आघाडी घेतली आहे.

पटनायक यांनी बिजेपूर व हिंजली या दोन्ही मतदार संघांत विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. एका जागेवरील उमेदवाराचे निधन झाल्याने तेथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष ठरण्याची चिन्हे असून त्यांचे उमेदवार २१ ठिकाणी आघाडीवर होते.  काँग्रेसने ११ जागांवर आघाडी घेतली असून तो  इ.स.२००० पासून प्रमुख विरोधी पक्ष आहे. माकप व जेएमएम यांनी एकेक मतदार संघात आघाडी घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक हे बिजद उमेदवारांच्या तुलनेत घासीपुरा व भंडारी पोखरी मतदार संघात पिछाडीवर आहेत. भाजप विधिमंडळ पक्ष नेते के. व्ही .सिंगदेव हे बिजद उमेदवार सरोज कुमार मेहर यांच्यापेक्षा पिछाडीवर असून ते पाटनागडचे विद्यमान आमदार आहेत. विधासभा सभापती असलेले बिजद उमेदवार प्रदीप कुमार आमट यांनी भाजपचे उमेदवार सुशांत कुमार प्रधान यांच्यावर आघाडी घेतली आहे.

बिजू जनता दल बहुमतासाठीचा ७४ जागांचा आकडा ओलांडणार हे निश्चित आहे. ओदिशात विधानसभेच्या एकूण १४७ जागा असून २०१४ मध्ये बिजू जनता दलास ११७ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या. भाजपने त्या वेळी चंचूप्रवेश करीत १० जागा पटकावल्या होत्या तर तीन जागा इतरांना मिळाल्या होत्या. समता क्रांती दलास १ जागा मिळाली होती. नवीन पटनायक यांनी यंदा जो विजय मिळवला आहे, तो त्यांनी गेली अनेक वर्षे राज्यात केलेल्या कामाचे फळ आणि ब्रँड नवीनचा करिष्मा आहे.