जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्व काळात मांसबंदीवरील निर्णयाचा वाद सुरू असतानाच आता नवरात्री दरम्यान मांसाहारावर बंदी आणावी, असे वक्तव्य करून केंद्रीयमंत्री डॉ.महेश शर्मा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महेश शर्मा यांनी हे वक्तव्य केले. शिवाय, नवरात्रीदरम्यान सर्व धर्मातील नागरिकांनी मांसाहार करून नये, असेही मत यावेळी शर्मा यांनी मांडले.
दरम्यान, शर्मा यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी सारवासारव करीत आपल्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता, असे म्हटले आहे. नवरात्रीत मांसाहारावर बंदी घालावी, असा आपला मुळीच उद्देश नव्हता. इतर धर्मातील नागरिकांच्याही भावनांचा सन्मान करायला हवा, असेही ते पुढे म्हणाले.