प्रसिद्ध मल्याळम लेखिका आणि कवयित्री अशिता यांचे बुधवारी (दि.२७) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले, त्या ६३ वर्षांच्या होत्या. कर्करोगाने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर त्रिशूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, येथेच त्यांनी प्राणज्योत मालवली.


अशिता यांचा जन्म ५ एप्रिल १९५६ रोजी त्रिशूरमध्ये झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली आणि मुंबईत झाले आहे. त्यानंतर त्यांनी एर्नाकुलमच्या महाराजा कॉलेजमधून इंग्रजी साहित्यातून पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या लेखनाच्या क्षेत्रात सक्रिय झाल्या. आजवर त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये विस्मया छिन्नांगल, अपोर्ना विरामंगल, अष्टाधायुदे कथकाल, मज्झमंगल ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

मल्याळम भाषेतील लेखनात विशेष कामगिरी केल्याबद्दल अशिता यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. यामध्ये प्रतिष्ठीत एडसेरी अवॉर्ड (१९८६) आणि ललितांबिका अंतर्जनम पुरस्कार (१९९४) यांचा समावेश आहे.