काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीबाबत सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोषी ठरवलं आहे. त्याप्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यातच लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. या निर्णयानंतर राजकीय स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “राहुल गांधी सत्य मांडत होते आणि मांडत राहणार. हे त्यांना पचत नाही. त्यामुळे राहुल गांधींवर समस्या संपतील असं त्यांना वाटत असेल. पण, त्यांच्या समस्या संपणार नाहीत. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. लढत राहू… लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागलं तरी तयार आहोत,” असा हल्लाबोल खरगेंनी भाजपावर केला आहे.

हेही वाचा : “माझा भाऊ कधी…” राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियंका गांधींचं ट्वीट चर्चेत; घोटाळ्यांची यादीच मांडली

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितलं की, “न्यायालयाच्या निर्णयानंतर २४ तासांत कारवाई केल्याने आश्चर्यचकीत झालो आहे. हे आपल्या लोकशाहीसाठी अशुभ संकेत आहेत.”

तर, “हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार झालं आहे. आम्ही तुरूंगात जाण्यासाठी तयार आहोत. मात्र, अडाणी प्रकरणात जेपीसी चौकशीची मागणी करत राहणार,” असं काँग्रसेचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं.

हेही वाचा : राहुल गांधींच्या शिक्षेमागे भाजपच्या ओबीसी राजकारणाचे गणित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, “राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे तानाशाहीचं एक उदाहरण आहे. भाजपाने अशाच प्रकारे इंदिरा गांधींवर कारवाई केली होती, हे भाजपा विसरत आहे. पण, तेव्हा त्यांना तोंडावर पडावं लागलं होतं. राहुल गांधी देशाचा आवाज आहेत, जे तानाशाहीविरूद्ध आणखी मजबूत होणार.”