Crime News : संतापाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम राहत नाही. लोक रागाच्या भरात काहीही करून बसतात आणि नंतर त्यांना यासाठी पश्चाताप करावा लागतो. असाच काहीसा प्रकार बंगळुरू येथे घडला आहे. येथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या हाताच्या बोटाचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीच्या कारने पावसाचे पाणी या व्यक्तीच्या वाहनानावर उडवले होते.
या व्यक्तीची ओळख जयंत शेखर अशी पटलू असून त्याला बोटाची शस्त्रक्रिया करावी लागली असून यासाठी जवळपास दोन लाखांचा खर्च करावा लागला आहे. त्यानंतर शेखर यांच्या पत्नीने हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली संबंधित व्यक्तिविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तक्रार दाखल करेपर्यंत तरी या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
नेमकं काय झालं?
रविवारी रात्री शेखर त्यांची पत्नी पार्वती आणि सासू यांच्याबरोबर रात्रीचे जेवण करून स्वत:च्या घराकडे जात होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शेखर हे बंगळुरूमधील लुलु मॉल अंडरपासजवळ होते आणि सिंग्नल ओलांडून वळणार होते. रस्ता ओलांडत असताना अजाणते पणाने त्यांनी पावसाचे पाणी दुसऱ्या एका व्यक्तीच्या वाहनावर उडवले. या चुकीसाठी शेखर यांना मारहाण आणि धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
“सिग्नल ओलांडल्यानंतर माझ्या लक्षात आले की i20 कार माझ्या कारला लागून चालत आहे. एक महिला पॅसेंजर सीटवर बसलेली होती, आणि ती माझ्यावर ओरडू लागली. तर गाडीचा चालक मला वारंवार गाडी थांबवण्यास सांगत होता,” असे शेखर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.
“त्या महिलेने तिच्या गाडीची खिडकीची काच खाली केलेली होती. हलका पाऊस पडत असल्याने मी तिला खिडकी वर करण्याची विनंती केली, पण ते जोडपे मला शिवीगाळ करत राहिले. काही मिनिटांतच त्या माणसाने माझी गाडी अडवली,” असेही त्यांनी सांगितले.
शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्या व्यक्तीने शेखर यांचा उजवा हात तोंडात पकडला आणि त्यांच्या बोटाचा चावा घेतला. ज्यामुळे त्यांना खोलवर जखम झाली. यानंतर त्यांना सर्जरी करून त्याला टाके घालावे लागले.
पाऊस पडत होता आणि रस्त्यांवर काही प्रमाणात पाणी साचले होते. ही घटना घडली तेव्हा पाऊस पडत होता. पाणी केव्हा दुसर्या वाहनावर उडाले हे माझ्या लक्षात आले नाही, असे शेखर यांनी सांगितले.
पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि दोन्ही पक्षांनी हाणामारी केली असण्याची शक्यता आहे, पण आरोपींनी कोणतीही उलट तक्रा दाखल केलेली नाही.