पीटीआय, इम्फाळ

मैतई समाजाची संघटना असलेल्या ‘अराम्बाई टेंगल’च्या नेत्याला अटक झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाने रविवारी इम्फाळ खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. जमावबंदी आणि इंटरनेट सेवा बंद केल्याने राज्यात दिवसभरत तणावपूर्ण स्थिती होती.

मणिपूरमध्ये २०२३ मध्ये झालेल्या हिंसाचाराशी संबंधित विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून रविवारी इम्फाळ विमानतळावर अराम्बाई टेंगल संघटनेच्या कानन सिंग यांना अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मणिपूर हिंसाचार प्रकरणांची चौकशी करत आहे. त्यामुळे सीबीआयने कानन सिंग यांना अटक केली. मात्र या अटकेनंतर इम्फाळ खोऱ्यात मैतई समाजाने हिंसक आंदोलनाला सुरुवात केली. मैतई नेत्याच्या सुटकेची मागणी करत आंदोलकांनी क्वाकेइथेल आणि अरिपोकमध्ये रस्त्यांवर टायर आणि जुने फर्निचर जाळले. इम्फाळ शहरात विविध भागांत पोलीस व सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांशी आंदोलकांची झटापट झाली. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खुराई लामलोंग येथे जमावाने एका बसला आग लावली.

राजभवनापासून जवळजवळ २०० मीटर अंतरावर असलेल्या कांगला गेटसमोर आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या सोडल्या. राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अतिरिक्त केंद्रीय दल तैनात करून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. आंदोलन करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या जिल्ह्यांमध्ये व्हीएसएटी आणि व्हीपीएन सुविधांसह इंटरनेट व मोबाइल सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. काठ्या, दगड, बंदूक किंवा धारदार शस्त्रे बाळगण्यास बंदी घातली असून असे आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे.

‘एनआयए’कडून तीन बंडखोरांना अटक

गेल्या वर्षी मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तीन बंडखोरांना अटक केली. या तिघांनी त्यांच्या साथीदारांसह १७ जानेवारी २०२४ रोजी तेंग्नौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे इंडियन रिझर्व्ह बटालियन (आयआरबी) चौकी आणि सुरक्षा दलांवर कट रचून हल्ला केला, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये कुकी इंपी तेंग्नौपाल (केआयटी) या बंडखोर गटाचा सदस्य थांगमिनलेन मतेचा याचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदारांची राज्यपालांशी चर्चा

राज्यात वाढलेल्या हिंसाचाराबाबत मणिपूरच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने रविवारी संध्याकाळी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांची भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी अराम्बाई टेंगल संघटनेच्या एका नेत्याला सीबीआयने अटक केली आहे, असे आमदार के. इबोमचा यांनी बैठकीनंतर सांगितले.