पीटीआय, इम्फाळ आपले सरकार इम्फाळ खोऱ्यातील एका बंडखोर गटाशी चर्चा करत असून, लवकरच एका शांतता करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी सांगितले. ही बोलणी प्रगत टप्प्यावर असल्याची माहिती सिंह यांनी पीटीआय-व्हिडीओशी बोलताना दिली, मात्र या भूमिगत संघटनेचे नाव त्यांनी सांगितले नाही. ‘आम्ही चर्चेत प्रगती करत आहोत आणि लवकरच एका भूमिगत संघटनेशी शांतता करार करण्याची आम्हाला अपेक्षा आहे’, असे ते म्हणाले. राज्यात गेल्या ३ मे रोजी वांशिक हिंसाचार उफाळल्यानंतर, सरकार अशा प्रकारची बोलणी करत असल्याबद्दल पहिल्यांदाच अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ) या प्रतिबंधित संघटनेच्या एका गटाशी सरकार बोलणी करत असल्याचे सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते.अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीच्या निषेधार्थ राज्याच्या पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढण्यात आल्यानंतर मे महिन्यापासून उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १८० हून अधिक लोक ठार झाले आहेत.