पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी पुण्यातील प्राच्यविद्या क्षेत्रात जागतिक कीर्तीची संशोधन संस्था अशी मान्यता पावलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा देखील केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्या प्रिय देशवासियांनो अशातच माझे लक्ष एका लक्षवेधी प्रयत्नाकडे गेलं. हा प्रयत्न आपले प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय बनवण्याचा आहे. पुण्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. या संस्थेत परदेशातील लोकांना महाभारताच्या महत्वाची ओळख करून देण्यासाठी ऑनलाईन कोर्स सुरू करण्यात आला आहे. तुम्ही हे जाणल्यानंतर थक्क व्हाल, हा कोर्स भलेही आता सुरू केला गेला आहे मात्र यामध्ये जे शिकवलं जातं, ती माहिती गोळा करण्याची सुरूवात १०० वर्षांपेक्षाही अगोदर झाली होती. जेव्हा संस्थेने याच्याशी निगडीत अभ्यासक्रम सुरू केला, तेव्हा त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मी या जबरदस्त प्रारंभाची चर्चा यासाठी करतोय, कारण लोकांना माहिती व्हावी की आपल्या परंपरेच्या विविध पैलूंना कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने सादर केले जात आहे. सातसमुद्रापार बसलेल्या लोकांना याचा लाभ कसा मिळेल, यासाठी देखील नवनवीन पद्धतींचा अवलंब केला जात आहे.”
“ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या सदरात भांडारकर इन्स्टिट्यूटच्या कामाचा आणि ‘महाभारतातील १८ पर्व’ ह्या ‘ऑनलाईन’ उपक्रमाचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींचे हे उद्गार आमच्यासाठी निश्चितच प्रेरणादायक आणि आगामी उपक्रमांसाठी उत्साह वाढवणारे आहेत. सादर प्रणाम व धन्यवाद! ” अशा शब्दांमध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटच्यावतीने मोदींनी केलेल्या प्रशंसेवर प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे.
मन की बात : “ओमायक्रॉनबाबत सावधगिरी बाळगावी लागेल”; संशोधन सुरू असल्याची पंतप्रधानांची माहिती
या वर्षातील हा शेवटचा मन की बात कार्यक्रम होता. यामध्ये पंतप्रधान मोदींनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या शौर्याबद्दल सांगितले. त्यांनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या शेवटच्या पत्रावर चर्चा केली. त्यांनी ते पत्र विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिले असावे, पण त्यांनी ते सर्वांना उद्देशून लिहिले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन वर्षात चांगले होण्याची शपथ घ्या, असेही पंतप्रधान म्हणाले.