Mohammed Shami’s Cousin Mumtaz : पाकिस्तान आणि दुबईत सध्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा खेळवली जात आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नुकताच या स्पर्धेतील उपांत्य सामना खेळवण्यात आला. भारत व ऑस्ट्रेलिया हे दोन संघ या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यादरम्यान, भारताची गोलंदाजी चालू असताना भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी मैदानावर सरबत पिताना दिसला होता. सध्या रमजानचा महिना चालू असून मुस्लीम समुदाय या महिन्यात दिवसभर निर्जळी उपवास (रोजा) करतात. मात्र, शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान, मैदानात सरबत पिताना दिसला. यावर मुस्लीम समुदायातील काही लोकांनी आक्षेप घेतला आहे.

अनेकांनी शमीविरोधात समाजमाध्यमांवर पोस्ट लिहिल्या आहेत. काहीजण शमीला ट्रोल करत आहेत. तर, ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बरेलीचे मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनीदेखील शमीच्या सरबत पिण्यावर आक्षेप घेतला आहे.

ट्रोलर्स दुबईतल्या तापमानात मैदानात उभे तरी राहू शकतील का? डॉ. मुमताज यांचा प्रश्न

समाजमाध्यमांवर शमीला ट्रोल केलं जात असतानाच शमीचा भाऊ डॉ. मुमताज मात्र आपल्या भावाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे एएनआय या वृत्तसंस्थेने मुमताज यांच्याशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मोहम्मद शमी देशासाठी खेळतोय. अनेक पाकिस्तानी खेळाडूही देशासाठी क्रिकेट खेळत आहेत. ते सामन्यांच्या दिवशी रोजा ठेवत नाहीत. खेळाडूंसाठी ही गोष्ट नवीन नाही. दुबईतील तापमान किती आहे हे या ट्रोलर्सना माहितीय का? इतक्या तापमानात १० षटकं जलदगतीने गोलंदाजी करणं खूप दूरची गोष्ट, पण एक षटक गोलंदाजी करणं किंवा मैदानात फार वेळ उभं राहणंही कांहीना जमणार नाही. तिथल्या वातावरणात १० षटकं जलदगती गोलंदाजी करणं खूपच अवघड आहे.”

मोहम्मद शमीला भावाची खंबीर साथ

डॉ. मुमताज म्हणाले, शमी ज्या वेगाने गोलंदाजी करतो तशी गोलंदाजी करताना एका षटकात खेळाडू दमून जातो. त्यामुळे या खेळाडूंना एनर्जी ड्रिंक घेणं आवश्यक असतं. शमी तिथे देशासाठी खेळतोय, त्याला या गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळे तो एनर्जी ड्रिंक प्यायल्याने जे लोक त्याला ट्रोल करत आहेत त्यांना शरम वाटली पाहिजे. देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंना असं बोलायला नको होतं. शमीला ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय ती शरमेची बाब आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी डॉ. मुमताज यांना प्रश्न विचारण्यात आला की या परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावाला काय संदेश द्याल. यावर मुमताज म्हणाले, “मी त्याला इतकंच सांगेन की तू या बिनकामाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. तू धीर बाळग. नऊ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या तयारीकडे लक्ष दे.”