काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे, असे विधान काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते.
#WATCH Shatrughan Sinha, Congress in Chhindwara, MP: Congress family from Mahatma Gandhi to Sardar Patel to Mohd Ali Jinnah to Jawaharlal Nehru…it's their party, they had the most important role in development & freedom of the country. This is the reason I've come here. (26.4) pic.twitter.com/HJg3EV8rNE
— ANI (@ANI) April 27, 2019
सिन्हा यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची स्तुती केली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. दरम्यान, त्यांनी आपल्या डायलॉगबाजीच्या अंदाजात भाजपावर पुन्हा एकदा सडकून टीका केली. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारलं खायला दिल्यासारखं होतं, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.
सिन्हा हे बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही कायस्थ समाजाचे आहेत. या मतदारसंघात कायस्थ समाजाची मोठी संख्या आहे.