गुरुग्राम येथे एका दुचाकीस्वाराला तब्बल २३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. देशात सध्या वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले असून वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागत आहे. नियम लागू करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुग्राममधील दुचाकीस्वाला याचा फटका बसला आहे. दिनेश मदान असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे. दिनेश मदानकडे वाहतूक परवाना, विमा, नोंदणी प्रमाणपत्र नव्हतं, तसंच प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. याशिवाय विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्या कारणाने हा दंड ठोठावण्यात आला. दिनेश हा पूर्व दिल्लीमधील गीता कॉलनीत राहतो. दिनेशने इतक्या नियमांचं उल्लंघन केलं होतं की हरियाणा वाहतूक पोलिसांनी त्याला तब्बल २३ हजारांचा दंड ठोठावला. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे. Dinesh Madan: Value of my scooty is around 15,000.I even got a copy of RC on WhatsApp from home but by then he had printed.The amount could have been less if he had waited for a while. I want that fine should be relaxed. From now on I will always carry my documents. — ANI (@ANI) September 3, 2019 परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड ५०० रुपयांवरून ५ हजार रुपये केला गेला आहे. मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता ४०० रुपयांऐवजी २ हजार रुपये दंड आकारला जाईल. कायमस्वरूपी चालक परवाना मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असून हे प्रमाण एकूण अपघात मृत्यूंच्या ६५ टक्के आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसवण्यासाठी नियम अधिक कडक करून वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे, यासाठी नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याने जुन्या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेतच मांडले होते. त्याला १७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात मंजुरी मिळाली. वाहतूक नियम अधिक कठोर – * रस्ते नियमांचा भंग – जुना दंड १०० रु., नवीन दंड ५०० रु * प्रशासनाचा आदेशभंग- जुना दंड ५०० रु, नवीन दंड २,००० रु. * परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड – ५०० नवीन दंड- ५,००० रु. * पात्र नसताना वाहन चालवणे- जुना दंड ५०० रु, नवीन दंड १०,००० रु * वेगमर्यादा तोडणे – जुना दंड – ४०० रु, नवीन दंड – २,००० रु * धोकादायक वाहन चालवणे, जुना दंड – १,०००, नवीन दंड ५,००० रु * दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड २,००० रु, नवीन दंड – १०,००० रु. * वेगवान वाहन चालवणे- जुना दंड – ५०० रु, नवीन दंड – ५,००० रु * विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड, ५,००० रु., नवीन दंड – १०,००० * सीटबेल्ट नसणे – जुना दंड- १०० रु, नवीन दंड – १,००० रु * दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड -१०० रु, नवीन दंड – २,००० रु * अॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड – १०,००० * विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड १,००० रु, नवीन दंड – २, ००० रु * अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा — २५,००० रु. दंड व मालक – पालक दोषी. ३ वर्षे तुरुंगवास.